भगवंत - ऑक्टोबर २१

ब्रह्मचैतन्य महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे . तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा , म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल .


आपले ध्येय काय असावे हे ठरविण्याची बुद्धी माणसाला आहे , ती खालच्या प्राण्यांना नाही . हाच माणसांत आणि त्या प्राण्यांत फरक आहे . प्राण्यांना प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात , त्याचप्रमाणे माणसालादेखील आलेले भोग भोगावे लागतात . पण भगवंताचा पाठिंबा ज्याला आहे तो मागेपुढे सोयीने भोग भोगू शकतो . जगातल्या घडामोडी जशा चालतात , तशाच आपल्याही सर्व गोष्टी प्रारब्धाने चालतात . आपण जे मिळविले आहे ते स्वतःच्या प्रयत्नाने मिळाले , ही कल्पना गेल्याशिवाय देह प्रारब्धावर टाकता येणार नाही . ‘ माझे सर्व हे त्याच्या कृतीचे फळ आहे , ’ असे म्हटले की क्रिया तर चालते , पण कर्तेपण राहात नाही , पुष्कळ गोष्टी अशा आहेत की , त्यांच्याकडे बोट दाखवून त्यांचे कारण अमुक , असे आपण सांगू शकतो . पण काही गोष्टी अशा आहेत की , त्यांचे कारण आपल्याला दाखविता येत नाही . अशा वेळी , त्या प्रारब्धाने घडल्या असे आपण म्हणतो . प्रारब्ध म्हणजे न समजणार्‍या गोष्टींचे कारण होय , असे म्हणायला हरकत नाही . संतांनादेखील त्यांचे प्रारब्ध भोगावे लागते , पण त्यांना देहबुद्धी नसल्याने भोगाचे सुखदुःख त्यांना नाही . व्यवहारदृष्ट्या औषध घेऊन मग भोग भोगणे हाच मार्ग खरा आहे . बुवाने आपल्या सिद्धीने रोग बरा करणें किंवा टाळणे हे बरे नाही . त्यामध्ये बुवाची प्रसिद्धी होईल खरी , पण त्यात त्याचे स्वतःचे कल्याण नाही , तसेच लोकांचेही पण हित नाही . समजा , एक मनुष्य रस्त्याने चालला असताना वाटेत एक दहा रुपयांची नोट पडलेली आढळली . पुर्वसंस्काराप्रमाणें ती उचलून घेण्याची वासना त्याला होईल , पण ती प्रत्यक्ष उचलून घ्यावी किंवा न घ्यावी हे ठरविण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे . म्हणून प्रारब्धाने देहभोग आला असता त्यामध्ये मनाची वृत्ती कशी ठेवावी हे स्वांतत्र्य आपल्याला आहे . ते प्रारब्धावर अवलंबून नाही . भगवंत सगुणात आला की त्यालादेखील प्रारब्धाचा नियम लागू झाला .

आपला जन्मजात स्वभाव जरी वाईट असला तरी अभ्यासाने तो खात्रीने सुधारता येईल . जोपर्यंत आपल्या अंतःकरणात अवगुण आहेत तोपर्यंत आपली प्रगती होणे फार कठीण आहे . शेत पेरण्यासाठी ज्याप्रमाणे जमिनीची मशागत करायला पाहिजे , त्याप्रमाणे भगवंताचे प्रेम येण्यासाठी आपले अंतःकरण दुर्गुणांपासून स्वच्छ केले पाहिजे . एकदा असे अंतःकरण शुद्ध झाले म्हणजे भगवंतावाचून दुसरा कोणी नाही ही भावना टिकविणे , म्हणजेच अनुसंधान ठेवणे , फारसे जड जात नाही . अनुसंधान हे आपले ध्येय ठरवून , त्याला अनुसरुन बाकीच्या गोष्टी कराव्या . त्याकरिता सर्वांनी मनापासून नाम घ्यावे , आणि आनंदात राहावे .

N/A

References : N/A
Last Updated : October 25, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP