सिद्धारुढस्वामी - प्रकरण १९

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


शुद्धकामदा

शरीर वंचिते मांसरुपिसें । परि अशुद्ध देही न मी फसें ॥

विमळ बुद्धि दे आणि मुक्ति दे । सदय आरुढा आत्मबुद्धि दे ॥३५॥

स्वामींनी प्रथम जनकराजाने स्थापिलेल्या कर्दमेश्वराचे दर्शन घेऊन दुसर्‍या मुक्कामाला भीमचंडीचे दर्शन घेऊन गंधर्वसेन , काकी शुक्त , पश्चिंमेश्वर इत्यादि लिंगे पाहून तिसर्‍या मुक्कामाला अयोध्यावासी श्रीरामचंद्राचे दर्शन घेऊन , द्रौपदीतीर्थ पाहून , पाचव्या मुक्कामाला पाच पांडव पाहिले . तेथून निघून मध्ये असलेली लिंगे पाचवे मुक्कामाला आले , तेथे कपिलधारातीर्थी आचमन करुन सिद्धकरी इत्यादी लिंगे पाहून स्वर्गफल देणारी सिद्धदुर्गाही त्यांनी पाहिली .

नंतर शिवराम नादाचे लिंग पाहून निर्वाश्या , सर्व सुंदरी , सिद्धि , बुद्धि , स्वधा , स्वाहा , महानिद्रा इत्यादि शक्तियुक्त देवता पाहून पंचक्रोश यात्रेची समाप्ती करुन ते एके ठिकाणी बसले . इतक्यात एक गृहस्थ लाह्याचे पीठ घेऊन जात होता , त्याने अवधूतास पाहून त्याला थोडेसे पीठ द्यावे , असा मनात विचार करुन दोन बुचुकल्या पीठ त्यास दिले . ते अवधूत घेऊन बसला आहे , इतक्यात दैवयोगाने काही भक्त तेथे येऊन दही -पीठ कालवून खात बसले . त्यांनी कोरडेच पीठ घेऊन बसलेल्या अवधूतास पाहून एक द्रोणभर दही व थोडेसे मीठ दिले . ते स्वामींनी घेऊन त्यात मीठ कालवून त्याचा लाडू करुन खाल्ला व तेथेच स्वरुपस्थितीत विश्रांती घेऊन सकाळी उठून प्रयागतीर्थाला निघाले . वाटेने मनात म्हणू लागले की , क्षेत्रसंचार करण्यास सामर्थ्य नसणारा क्षेत्रनामाचे संकीर्तन करील तर तो धन्य होईल . कारण सर्व तीर्थक्षेत्रांची नावे परमात्मावाचक आहेत ; म्हणून त्या नामाचे ध्यान करणारा ते रुपच पावतो . नंतर प्रयागतीर्थास पोचल्यावर संगमाच्या ठिकाणी स्नान करणारे , तीर्थाच्या कावडी भरणारे , आणि रामेश्वराहून आणलेल्या वाळूची लिंगे करुन संगमात निमज्जन करणार्‍या पुष्कळ लोकांनी पाहून स्वामी म्हणाले की , हे ह्या कर्माने ईश्वराला प्रसन्न करुन घेऊ त्याच्या प्रसादाने पुनीत होऊन , ज्ञानाला अधिकारी होतील ; असे म्हणून तेथून निघून किल्ल्यात संगमनाथाचे दर्शन घेऊन अक्षय्यवटाचे मूळ पाहूय तेथून निघून झडीच्या पावसाला सुरुवात झाली . मेघ गडगडू लागले , सोसाट्याचा वारा वाहू लागला , विजा चमकू लागल्या , वादळाने दिशा धुंद झाल्या अशावेळी सुद्धा शांत चित्ताने एक अलंकारिक विचार करीत चालले होते . तो असा की मेघ का गडगडत असावे ? इंद्राचा शत्रू जो मैनाकपर्वत तो समुद्रात बुडाला आहे व समुद्रनाथने त्यास पाठीशी घातले आहे , म्हणून इंद्राचा योद्धा मेघ हा समुद्रनाथाला मोठमोठ्याने ओरडून सांगत आहे की , इंद्राचा शत्रू मैनाकपर्वत याला बाहेर सोडतोस की युद्धास येतोस ? मेघाच्या गडगडण्यावर ही उत्प्रेक्षा आहे .

गावात गेल्यावर एका सावकाराच्या घरात जाऊन बसले . तेव्हा एक सेवक येऊन म्हणाला की हे सावकाराचे घर आहे . तू येथे का बसलास ? तेव्हा अवधूत म्हणाले , हा मुशाफरखाना आहे , असे समजून मी इथे बसलो . सेवक म्हणाला तू मूर्ख आहेस ? मी शेण खात नाही , अन्न खातो . मला शेण खाणारा म्हणतोस तेव्हा तूच मूर्ख असे अवधूत म्हणाले . सेवक म्हणाला मी कसा मूर्ख ? तेव्हा स्वामी म्हणाले , ह्या घरात हल्ली कोण राहतो ? सावकार ; ह्याच्यापूर्वी कोण रहात होते ? ह्याचा बाप ; ह्याच्या पूर्वी ह्याचा आजा ; समजले बाबा . तेव्हा स्वामी म्हणाले एकामागून एकजण एथे वस्ती करीत आले आहेत ; स्थिर असा कोणीही राहिला नाही . तर मग हा मुशाफरखाना नव्हे काय ? हे मर्म न समजता हे घर सावकाराचे आहे , असे म्हणतोस तेव्हा तू मूर्ख नव्हेस काय ? असा दोघांचा वाद मोठमोठ्याने चालला आहे ; असे पाहून सावकार आतून बाहेर येऊन सेवकास म्हणाला , ह्या सर्व गोष्टी वैरग्यास कारण आहेत व त्याचे बोलणे नीतीस अनुसरुन आहे म्हणून ह्याने मला उपदेशच केला .

याकरिता हा माझा खरोखर गुरुच होय . असे शिपायास सांगून अवधूताकडे पाहून प्रार्थना करु लागला की , गुरुमहाराज , आज आपण इथेच राहावे व उद्या जावे . तेव्हा अवधूत म्हणाले , तूही आपल्या आयुष्याच्या एके दिवशी जाणार आहेस , तेव्हा या धर्मशाळेत मीही तसाच आहे .

मग सावकाराने नम्रपणे नमस्कार करुन हात धरुन त्यांना माजघरात नेले . आरसेमहाल दाखवून दिवाणखानाही दाखविला . तेथे त्याची मुले बुद्धिबळे खेळत होती . तेथे अवधूतांनी एकदा प्यादेमात आणि घोडमात केली . आणि एका डावात राजा हत्तीजवळ , व एका डावात वजिराजवळ असूनही त्यास शह दिले . एका डावात बुरजी झाली . तेव्हा सर्वजण म्हणाले , हा बोलण्यात व खेळण्यातही हुषार आहे . मग त्याला दुसर्‍या घरात भोजनास घेऊन जात असता तीन महिन्यांपासून सावकाराची आई पोटशूलाने आजारी होती . तिच्या पोटात मोठी कळ येऊन ती रडू लागली . तिचे रडे ऐकून अवधूत म्हणाले , कोण रडत आहे ? तेव्हा सावकार म्हणाला , माझ्या आईला तीन महिन्यांपासून पोटशूळाची व्यथा आहे व आज कळ अधिक उठल्यामुळे ती रडत आहे . तेव्हा अवधूत म्हणाले असे धैर्य सोडू नका . चला आपण तेथे जाऊ ; असे म्हणून सर्वजण तेथे गेले . स्वामी म्हणाले , पूर्वजन्मात केलेले पाप दुसर्‍या जन्मात व्याधिरुपाने पीडा देते . ते शिवध्यान , मानसपूजा , महात्म्यांचे पादतीर्थ घेणे , इत्यादि उपायाने नाहीसे होते . हे ऐकून सावकाराने ह्या महात्म्याचे पादतीर्थ दिले , तत्काल पोटशूळ बंद झाला . ते पाहून सर्वांना आनंद झाला .

शुद्धकामदा

त्रिगुणमूर्ति तूं भक्तवत्सला । जगतिं ज्योति तूं सत्व सच्छिला ।

कवण जाणिजे तुझिया गुणा । निगम बुद्धि दे आदिकारणा ॥३६॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP