सिद्धारुढस्वामी - प्रकरण १२

प्रस्तुत ग्रंथ श्री कबीरदासस्वामी यांनी रचिला आहे . श्री सिद्धारूढस्वामी हे खरे सद्‍गुरू आहेत .


कामदा

देहबुद्धिचा मोहपाशही । नासुनी तसी मत्वबुद्धि ही ॥

आत्मबुद्धि सोऽहं अशी मला । देइ आरुढा हे अघानला ॥२१॥

नंतर पाचव्या दिवशी तिरकराय देवाची पूजा करणारा रामभट्ट येऊन विचारु लागला की , स्वामी तुम्ही मलयनाथाला दृग्दृश्य विचार ऐकविला . तो असो . हा सर्व प्रपंच कोणत्या प्रकाशाने प्रकाशतो ? असे त्याने विचारिले तेव्हा अवधूत म्हणाले , ऐक . हे रामभट्टा , दिवसा सूर्याचे ज्योतीने प्रकाशतो , असे ऐकिले नाहीस ? रामभट्ट म्हणाला होय दिवसा सूर्याची ज्योती ; एके रात्री कोणती ज्योति म्हणशील तर चंद्र , दीप , नक्षत्रे , खद्योत , विद्युल्लता वगैरे रात्रीचा प्रकाश होय , तेव्हा महाराज म्हणाले असे आहे तर दिवसा असलेली सूर्यज्योति रात्री असलेल्या दीपादीप पदार्थाच्या ज्योतीच्या योगाने प्रकाशते ! हे ऐकून ‘ नेत्राच्या योगाने ’ असे भट म्हणाला . झाकणे व उघडणे हे दोन धर्म आहेत . यामुळे डोळे उघडले म्हणजे सर्व प्रकाशमय होते . परंतु डोळे झाकले म्हणजे कशाच्या योगाने प्रकाश होतो . असे महात्मे म्हणाले , बुद्धीने प्रकाश होतो असे भट्ट म्हणाला , तेव्हा समर्थ म्हणाले की , ही बुद्धी कोणापासून प्रकाशते ! भट्ट म्हणाला प्रथम स्फूर्तिरुप अहंकार युक्त भेदभावाने प्रकाशते , तेव्हा समर्थांनी विचारिले . समाधी लागल्यावर अहंकार लय होतो ; व चिदाभास त्याचा त्यात ऐक्य होतो . नंतर स्वेतर ज्ञान शून्यरुपी चिदाभास स्वयंज्योति स्वरुपात्मक आत्माच सर्व अवस्थेत सव दृग्दृश्य प्रकाशणारा आहे म्हणून तोच स्वज्योती असे तू समज हे ऐकून निजस्थिती प्राप्त होऊन कृतार्थ झाले , कृतार्थ झालो , असे म्हणून नमस्कार करुन उपरती पावला . नंतर सहाव्या दिवशी कर्मकांड वादी चिदंबर दीक्षित येऊन विचारु लागले की अवधूता तू ‘ तत्त्वमासि ’ ह्या महावाक्याचा काय अर्थ करितोस ? अवधूत म्हणाले तूच ब्रह्म आहेस असा अर्थ करितो .

दीक्षित म्हणाले असा करु नये कारण कर्म करणारा आत्मा देव लोकास जाऊन देवत्व मिळवून शुद्ध झाल्यानंतर स्तुतिपर होईल . अवधूत म्हणाले , महावाक्य कर्मकांड संबंधपर नसल्यामुळे स्तुतिपर म्हणू नये , कारण द्रव्य , गुण , कर्म , जाति , धर्म , वर्ण , आश्रम असेल तर त्या वस्तूला स्तुतिपर म्हणणे शोभेल . निरालंब निर्विशेष आत्म्याला कोणतीही कल्पना शोभत नाही . म्हणून स्तुतिपर न होता महावाक्य मुमुक्षूला उपदेशपरच होते . स्तुतिपर झाले तर महावाक्य समजण्यास ज्ञानी कर्माश्रमधर्माच्या अभिमानाने कर्मात तत्पर झाला पाहिजे असेच जिकडे तिकडे दिसत असून स्तुतिपर असलेले तुझे वाक्य शास्त्राविरुद्ध म्हणावे .

यावरही दीक्षित म्हणाले , असं असेल तर उपासनापर का होऊ नये ! अवधूत म्हणाले प्रत्येक उपसनापर म्हणतोस किंवा अहंगृह म्हणतोस ! दीक्षित म्हणाले अहंगृह असे म्हटले तर ज्ञान्याला मानसकर्म आहे , असे म्हणावयाला प्रमाण नाही . म्हणून उपासनापर नव्हे . असे आहे तर ज्ञान्याला कर्म नाही . ह्या म्हणण्यास असे प्रमाण आहे की , ‘ न कर्मणा न प्रजया न धनेन त्य़ागेनैके अमृतत्व मानशुः ’ असे श्रुत्युक्त प्रमाण आहे की . तर मग ही श्रुती त्यागपर होईल ; ज्ञानपर होणार नाही म्हणून इतर श्रुती ज्ञानादेव तु कैवल्यं नान्यः पंथापन य विद्यते " अशी श्रुती आहे ; म्हणून महावाक्य ज्ञानपरच ; कर्मपर नव्हे . कर्मपर असते तर अविद्या निवारक झाले नसते असे म्हटल्यावर शांत झाले . नंतर सातव्या दिवशी प्रातःकाळी अवधूत ब्रह्मानंदरुपाने देवाच्या पुढे असलेल्या सभामंडपात बसले असता न्यायशास्त्र जाणणारा तिरकंभट येऊन अवधूताला विचारु लागला , तुम्ही ब्रह्मात्मैक्याला काय लक्षणाने ओळखावे म्हणता ?

महात्मे म्हणाले , जे सुखदायक , नित्य प्रकाशमान असणारे , श्रेष्ठ असलेले , नामरुपाचा आधार असलेले , बुद्धीला अगोचर असलेले , बुद्धीला प्रकाशविणारे , शुद्ध , अपार , महावाक्य लक्षार्थ , जे आहे , तेच ते असे समजावे . तर मग ब्रह्मवाक्य नाहीच . त्यावर महात्मे म्हणाले , विषयातच सुख आहे , निद्रेत सुख आहे . नैयायिक आनंदालाही गुण समजतात . सुखच ब्रह्म म्हटले तर तिन्ही वस्तूंत ब्रह्मत्व होईल ; असे झाल्यास क्षणिक , अनित्य , सातिशय अशा त्रिदोषाने व्याप्त होऊन ब्रह्माचे लक्षण सर्व ठिकाणी व्यापून राहील , या योगाने ब्रह्माला सुखमात्र एक लक्षण न देता सुखाच्या जोडीला नित्य असे लक्षण जोडावयाचे , सोडले तर कोणताही अतिव्याप्तीचा दोष येणार नाही काय ? तर मग नित्य लक्षणमात्र लक्षित आहे , ब्रह्म म्हणजे आकाश , दिशा , काल , मन , आत्मा त्याप्रमाणेच पृथ्व्यादि पंचमहाभूते , परमाणु , वगैरे हे सर्व पदार्थ नित्य समजून ब्रह्मच होतील . असे होऊ नये . ब्रह्म नेहमी प्रकाशित आहे , म्हणून निर्दोष , तर मग हे सिद्धांत्या . ब्रह्मप्रकाश लक्षण मात्र शिल्लक राहिले म्हणजे सूर्य , चंद्र , अग्नी , ज्योती , वीज वगैरे प्रकाशयुक्त पदार्थमात्रात अतिव्याप्ती होईल . म्हणून त्याच्या निवृत्तीसाठी विभुलक्षण लाविले तर अतिव्याप्ति होणार नाही . तर मग विभू हे एक लक्षण सांगितले तर आकाशात अतिव्याप्ती होईल . त्याच्या निवृत्तीकरिता आधार हे दुसरे लक्षण लावले तर तो दोष नाहीसा होतो . ह्याप्रमाणे कोणत्याहे रीतीने अतिव्याप्ती दोष आल्यास पुढील निवृत्ती होईल . पण आनंदाला गुण म्हणणे योग्य नाही . कारण गुणाला त्यांनी आगंतुकत्व सिद्ध केल्यामुळे आनंद गुण होईल तर , एककाली कदाचित विच्छिप्ती होईल . आत्मन आधाररुप प्रेमाला केव्हाही विच्छीप्ति नाही म्हणून आनंद गुण नव्हे . मग तिरकंभट म्हणाले बुद्धीला ब्रह्म न समजणारे आहे तर मग अविद्यामूलकबंध बुद्धीचे दुःख नाहीसे कसे होईल ? असे विचारले तेव्हा ही गोष्ट असंस्कृत बुद्धीला लागू नाही . वेदांतश्रवणाने संस्कृत झालेल्या बुद्धीला अवेद्य असे सांगणे योग्य नव्हे . अशुद्ध बुद्धीचे लक्षण परद्वारा शोधन तत्पद लक्ष्याला व्यापून आहे म्हणून आवरण भंग होऊन ब्रह्मसाक्षात्कार झाला म्हणवितो , तेव्हा दुःखनिवृत्ती होते . हे ऐकून तिरकंभट विश्राम पावले .

भुजंगप्रयात

तुझे कर्ण हे ब्रह्मरुपीं अहा रे । तुझे नेत्र हे स्वप्रकाशीं महा रे ॥

तुझ्या दर्शनें पाप हें नाश होई । गुरु सिद्ध तो स्वात्मबुद्धीच देई ॥२२॥

N/A

References : N/A
Last Updated : August 29, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP