एप्रिल २३ - संत

महाराजांचे प्रवचन वाचले की वाटते , श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे .


संतांना ग्रंथ लिहिण्याची मुळीच हौस नसते , नाइलाज म्हणून ते ग्रंथ लिहीत असतात . तुम्हाला असे वाटते का , की नाथांनी आणि समर्थांनी ज्ञानेश्वरीची पारायणे करुन नंतर आपले ग्रंथ लिहिले ? त्यांचे ज्ञान स्वतंत्र असते , आणि ते साक्षात भगवंतापासून आलेले असते . त्यामधे अर्थात मागील ग्रंथकारांनी सांगितलेल्या काही गोष्टी येणारच . संतांनी लिहिलेले ग्रंथ हे त्यांच्या मृत्युपत्रासारखे आहेत . आपले मुलगे चांगले वागतील अशी ज्या बापाला खात्री वाटते तो कशाला मृत्युपत्र लिहील ? तशी ज्याला खात्री नसते तो नाइलाजाने मृत्युपत्र लिहीतो ! त्याचप्रमाणे , संतांनी हौसेने किंवा विद्वत्ता दाखविण्यासाठी ग्रंथ लिहिले नाहीत तर आपल्यासारख्या जडजीवांचे कल्याण व्हावे ही तळमळ त्यांना होती म्हणून त्यांनी ग्रंथ लिहिले . पोथी , पुराणे , सत्पुरुषांचे ग्रंथ , यांचा आपल्या जीवनाशी निकट संबंध असतो . ग्रंथांमध्ये , ज्याचा व्यवहारामध्ये उपयोग करता येतो असा वेदान्त सांगितलेला असतो . आपल्याला सुचणार नाहीत इतक्या शंका समर्थांनी घेऊन त्यांची उत्तरे दासबोधात दिली आहेत . परमार्थ न ऐकणारा दोषी आहे , पण तो ऐकत नसताना त्याला सांगणारा त्याहूनही दोषी समजावा . हा दोष पत्करुनही संत जगाला परमार्थ सांगत असतात , त्याचा फायदा करुन घ्यावा .

ग्रंथ वाचीत असताना , ध्येय जर परमार्थप्राप्ती हे असेल तर त्यासाठी त्या ग्रंथात साधन कोणते सांगितले असेल इकडे लक्ष असावे . साधनाची योग्य निवड झाली की साध्य साधेलच . ज्या विषयात पारंगत व्हायचे तीच पुस्तके वाचणे जरुर असते . आमचे उलट होते ; गणित विषय घेतो आणि वाचतो कादंबर्‍या ! मग गणितात पास कसे होणार ? परमार्थ हेच जर ध्येय असेल तर संतांच्या ग्रंथांचाच अभ्यास करावा , त्यांचेच श्रवण -मनन करावे .

आपण आपले मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावे , आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्यावा . कधी तो सुखात राहील , तर कधी तो दु :खात राहील ; कधी तो बरेच दिवस सरळ जाईल , तर कधी तो मधेच गचका खाऊन बुडायच्या बेताला येईल ; पण त्याच्या कोणत्याही अवस्थेमधे आपला आनंद कायम टिकेल यात शंका नाही . आपल्या देहाकडे आपण वेगळेपणाने पहायला शिकले पाहिजे . मन द्यावे भगवंताला आणि देह द्यावा प्रारब्धाला , म्हणजे हे साधेल . देहाचे सुखदु :ख वरवरचे असावे , ते आत शिरुन मनावर परिणाम करता कामा नये . भगवंताच्या नामाने हे हमखास साधते . म्हणून अखेर नामाशिवाय गत्यंतर नाही .

N/A

References : N/A
Last Updated : May 20, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP