लघुभागवत - अध्याय १० वा

लघुभागवत हे एक उपपुराण आहे.


नंद आणि समस्त मंडळी । येऊनि पावतांचि गोकुळीं ।
सीमान्तस्थळीं एक्या मेळीं । सर्व जन राहिले १
पुढें अक्रूर जाऊनि वेगें । कंसासी समाचार सांगे ।
इकडे बलराम कृष्ण दोघे । नगरशोभा देखती २
रामकृष्णांची थोर कीर्ती । मथुरेमाजीं प्रकटली होती ।
म्हणूनि ऐशा दिव्य विभूती । देखावयाकारणें ३
लोटला जनसंभार । गजबजलें सारें नगर ।
सुवेष सालंकार । नारीनर मिरविती ४
तंव कृष्ण पाहे राजरजक । त्यासी म्हणे क्षण एक ।
उभा राहें दाखवीं अनेक । राजवसनें मोलाचीं ५
यावरी तो उन्मत्त रजक । वदला तिरस्कारपूर्वक ।
मज दिससी तूं मानव मूर्ख । राजवेष इच्छिसी ६
तेव्हां कृष्ण होऊनि क्रोधाविष्ट । मुखीं दिधली एक चपेट ।
तत्क्षणीं तो रजक धीट । गतप्राण जाहला ७
पुढें मार्गीं अनेक जन । करिती कृष्णाचें पूजन ।
तेविं चंदन उटीचें विलेपन । करी कुजा सद्भावें ८
त्या सद्भक्तीचें फळ । तीतें देई घनघीळ ।
वक्र अंग केलें सरळ ।सकृप होऊनि तियेचें ९
ऐसे अनेक चमत्कार । दाखवीत वसुदेवकुमर ।
यज्ञशालेसमोर । दोघे बंधु पातले ॥१०॥
तेथें इंद्रधनुष्य देखिलें । तीं सहज कृष्णें उचलिलें ।
हें पाहतां निरोधिलें । व्दारपाळें तयासी ॥११॥
ऐसा व्दारपाळ उन्मत्त । देखूनि केला त्याचा अंत ।
तत्काळ जाणविती दूत । घडलें वृत्त कंसातें ॥१२॥
मग  कृष्णाचें पारिपत्य । करावया बहुत दैत्य ।
कंसें धाडिले तेही समस्त । मृत्यु पावले क्षणार्धे ॥१३॥
तेव्हां मथुरावासी समस्त । जन झाले विस्मित ।
कंसही झाला भयभीत । न ये निद्रा तयासी ॥१४॥
दुसरे दिनीं मल्लयुध्द । होणार ऐसें झालें प्रसिध्द ।
सपरिवार गोप नंद । पाचारिले त्या समयीं ॥१५॥
त्यापरी नेमिल्या वेळीं । मंडपीं मिळाली मंडळी ।
नंदें कंसासी प्रथम अर्पिलीं । वस्त्रें भूषणें सन्मानें ॥१६॥
तंव रामकृष्ण उभय भ्राते । पातले देखूनि महातें ।
कुवलयापीड गजातें । कृष्णावरी लोटिलें ॥१७॥
करुनि गजाचा तिरस्कार । पुच्छ ओढुनि केला जर्जर ।
शेवटीं करुनि तीक्ष्ण प्रहार । महात आणि गज वधिला ॥१८॥
स्कंधीं घेऊनि हस्तिदंत । रामकृष्ण आले मंडपाआत ।
त्यांसी देखोनि भ्याले बहुत । कोणी सप्रेम देखती ॥१९॥
तंव मुष्टिक आणि चाणूर ।  मल्लयुध्दीं दैत्य चतुर ।
आवेशें रामकृष्णांसमोर । दंड पिटूनि राहिले ॥२०॥
तेव्हां बलराम आणि चाणूर । कृष्ण आणि मुष्टिक वीर ।
युध्द जुंपले परस्पर । प्रेक्षक तटस्थ देखती ॥२१॥
त्या युध्दीं अकस्मात । उभय दैत्य झाले मृत ।
तें देखूनि मल्ल समस्त । कृष्णावरी धांवले ॥२२॥
तेही पावले मृत्युपंथी । तेव्हां कंस दचके चित्तीं ।
नंदासी म्हणे शत्रुप्रती । आश्रय कैसा त्वां दिधला ॥२३॥
हा राजद्रोहाचा भयंकर। अपराध केला त्वां साचार ।
तरी बंदिवास निरंतर । आम्ही तूतें नेमिला ॥२४॥
तैसेंचि वसुदेव देवकीसी । आतांचि वधावें, आज्ञा ऐसी ।
दूतांसी केली, कीं आम्हांसी । कपट केलें तयांनीं ॥२५॥
आणि रामकृष्णासि दूर । घालवा येथूनि सत्वर ।
ऐसे कंसाचे कठोर उद्रार । ऐकूनि कृष्ण कोपला ॥२६॥
कंस प्रत्यक्ष मातुल । परी अत्यंत क्रूर दु:शील ।
म्हणूनि देहान्त शिक्षाच केवळ । योग्य ऐशा नरातें ॥२७॥
ऐसें कृष्णें धरिलें मनीं । आणि उडी घेऊनि सिंहासनीं ।
कंसाचा चेपितां कंठमणी । प्राण तेणें सांडिला ॥२८॥
कंस झुंजला बहुकाळ । परी मृत्यु येतां जवळ ।
प्रयत्न होती सकळ निष्फळ । न चले बळ कोणाचें ॥२९॥
ऐसा घडला कंसवध । येथें इतुकाचि घेणें बोध ।
कीं जो वागे होऊनि मदांध । नाश त्याचा शेवटीं ॥३०॥
आणि नम्रता ज्याचे अंगीं । तोचि मान पावे जगीं ।
आढयता मिरविणें वाउगी । तें मूर्खत्व जाणावें ॥३१॥
कंसवध ऐकूनि सर्वत्र । मथुरेंत झाला हाहा:कार ।
अष्ट बंधु त्याचे धुरंधर । कृष्णावरी धांवले ॥३२॥
वैर्‍याचा उगवावया सूड । धांवले ते आठही मूढ ।
परी कृष्णाचें बळ उदंड । नाहीं त्यांनीं जाणिलें ॥३३॥
ज्यापरी पाहूनि दीप । पतंग घाली झडप ।
मृत्युमुखीं आपोआप । पडे स्वशक्ति नेणुनी ॥३४॥
तैसे कंसभ्राते सकळ ।मृत्यु पावले तत्काळ ।
दैत्यांसी मनीं तळमळ । अहोरात्र लागली ॥३५॥
ऐसा पराक्रम करुनि अद्भुत । केलीं जननी आणि तात ।
तत्क्षणींच बंधमुक्त । जयजयकार जाहला ॥३६॥
सामर्थ्यवंत निजतनय । पाहूनि देवकीचें हृदय ।
उचंबळलें अतिशय । वसुदेवही तोषला ॥३७॥
मग उग्रसेन कंसतात । त्यातेंही करुनि बंधमुक्त ।
राज्य त्याचें त्यासी देत । श्रीकृष्ण सुत कन्येचा ॥३८॥
तैसेचि अनेक यादव । केवळ कंसभयास्तव ।
गेले जे जे दूर सर्व । ते मथुरेसी परतले ॥३९॥
मग कांहीं काळपर्यंत । बलराम कृष्ण राहिले तेथ ।
नंद आणि गोपाळ समस्त । गेले परत गोकुळीं ॥४०॥
योग्य काळीं मौंजीबंधन । झालियावरी, सांदीपन ।
गुरुच्या गृहीं रामकृष्ण । विद्याभ्यासासी राहिले ॥४१॥
कष्ट करुनि रात्रंदिवस । सोत्कंठ दोघे करिती अभ्यास ।
तेव्हां गुरुसी होऊनि संतोष । गुरुदक्षिणा याचिली ॥४२॥
जेधवां होय शिक्षणासमाप्ती । तेव्हांचि गुरुचे हातीं ।
दक्षिणा द्यावी ऐशी पध्दती ।  होती पूर्वी सर्वत्र ॥४३॥
असो सांदीपन म्हणे कृष्णा । द्यावी आम्हां गुरुदक्षिणा ।
सागरीं बुडाल्या माझ्या नंदना । सजीव करुनि देइजे ॥४४॥
कृष्ण म्हणे आपण गुरु । सांगाल तें अवश्य करुं ।
मागाल तरी कल्पतरु । आणूनि देऊं या समयीं ॥४५॥
मग जाऊनि सागरापाशीं । म्हणती गुरुपुत्र दे आम्हांसी ।
येरु म्हणे नसे मजपाशीं । सत्य ऐसें सांगतों ॥४६॥
परी माझे उदरीं निरंतर । वसतसे शंखासुर ।
तेणें भक्षिला गुरुकुमर । ऐसी वार्ता ऐकिली ॥४७॥
तेव्हां शंखासुराचें उदर । कृष्णें चिरितां न दिसे कुमर ।
मग यमापासूनि गुरुपुत्र । परत घेतला शेवटी ॥४८॥
पुत्र आणूनि गुरुसी देतां । संतोष होय त्याचे चित्ता ।
आशीर्वादें बंधु उभयतां । गौरवीले बहुमानें ॥४९॥
असो वंदन करुनि गुरुसी । रामकृष्ण आले मथुरेसी ।
पुढील कथा वर्तली कैसी । ते सावध परिसावें ॥५०॥
कंसाचा श्वशुर जरासंध । त्यासी कळलें कीं कंसवध ।
कृष्णें केला, म्हणूनि युध्द । करुनि यादव संहारुं ॥५१॥
ऐसा करुनि विचार ।वेष्टिलें तेणें मथुरानगर ।
परी झुंझले यादव वीर । जरासंघ पळविला ॥५२॥
ऐसें अनेकदां झाले युध्द। तितुक्या वेळ जरासंध ।
पराभवितां वैरसंबंध । दिवसेंदिवस वाढला ॥५३॥
पुढें कालयवन वीर प्रसिध्द । कृष्णासंगें करी युध्द ।
ही संधि साधूनि जरासंध। त्याच वेळीं धावला ॥५४॥
युध्द जुंपलें घनघोर । यादव झाल सकळ जर्जर ।
आतां नाश होणार समग्र । ऐसें कृष्णें देखुनी ॥५५॥
मथुरेपासूनि दुरी । निर्मिली एक सागरीं ।
व्दारका नामें रम्य पुरी । यादवांसाठीं केवळ ॥५६॥
तेथें धाडिले सर्व । मथुरा नगरीचे यादव ।
आणि युक्ति केली अभिनव । कालयवन वधावया ॥५७॥
आपण धांवे पुढें वेगें । कालयवन लागे मागें ।
ऐसें होतां देखिली मार्गे । गुहा एक भयंकर ॥५८॥
त्या गुहेमाजीं अवचित । कृष्ण झाला गुप्त ।
तेथेंचि होता एक गुप्त । साधु महंत तपस्वी ॥५९॥
काळयवनें त्यासी देखुनि । समजला ऐसें मनीं ।
कीं कृष्णचि साधुवेष घेउनी । निद्रित झाला भयानें ॥६०॥
म्हणूनि आवेशें लाथ । मारितांचि अकस्मात ।
साधु होऊनि जागृत । काळयवन जाळिला ॥६१॥
हा पवित्र साधु प्रतिसविता । इक्ष्वाकुवंशीं नृप माघाता ।
तनय त्याचा शूर ज्ञाता । मुचकुंद नामें प्रसिध्द ॥६२॥
एकदां झुंझले दैत्यांसी देव । तेव्हां देवांतें साहाय्य सर्वस्व ।
करुनि, शीणतां विश्रांतीस्तव । गुहेमाजी झोंपला ॥६३॥
ब्रह्मदेवें त्यासी चांग ।  वर दिधला, तव निद्राभग ।
करील, त्यातें मृत्युयोग । दृष्टिपातें होईल ॥६४॥
त्यापरी कालयवन । दृष्टिपातें झाला दहन ।
मग कृष्णें दिधलें दर्शन । मुचकुंदते त्या समय़ीं ॥६५॥
तेव्हांपासूनि कृष्णभक्त । झाला मुचकुंद विख्यात ।
मग वसुदेवदेवकीसुत । कृष्ण गेला व्दारके ॥६६॥
भागवत ग्रंथ प्रसिध्द । तेथील सार सुबोध ।
गातसे भक्त गोविंद । बालहिताकारणें ॥६७॥
याचें करितां श्रवण पठण । आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण ।
प्राप्त होईल विद्या धन । ऐसें वरदान व्यासाचें ॥६८॥
इति श्रीलघुभागवत दशमोऽध्याय: ॥१०॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP