श्रीकृष्ण कथामृत - पंधरावा सर्ग

संतकवि श्रीगणुदास यांनी रचलेले श्रीकृष्ण - कथामृत अमृताची गोडी देते.


( शमोद्योग )

व्योमानिलानल जलावनि सोमसूर्य -
हो त्री भि र ष्ट त नु भि र्ज ग दे क ना थः
यस्तिष्ठतीह जन -- मंगल -- धारणाय
तस्मै नमोस्तु निरपेक्षहृदे शिवाय ॥१॥
झरे सतत वाहते तव कृपारसाचे नवे
जरी न मज लाभले तरि न शब्दही आठवे
फुलेल तरु पोषणाविण कसा कथावें तरी
म्हणोनि गुरुमाउली वरदहस्त ठेवी शिरीं ॥२॥
वास वनीं अज्ञातीं तेवीं
धर्म बळावर धर्म संपवी
धौम्य पुरोहित म्हणे तयासी
“ दावध व्हावें अतां मनासी ॥३॥
राज्य तुझें तुज वडिलोपार्जित
युद्धावांचुन मिळे न निश्चित
त्यादृष्टीनें वर्षे गेलीं
अंधसुतानीं खटपट केली ॥४॥
जनार्थ केल्या बहुसुखसोयी
प्रवास आतां निर्भय होई
पाट काढिले शेतीसाठीं
रंजक वस्तू भरल्या हाटीं ॥५॥
वाया जाइल मानव शक्ति
नाद लाविले किती या रीतीं
करुन विडंबन गतकालाचें
पवाड गाती निजमहतीचे ॥६॥
सतत असत्या प्रचारुनीया शाश्वत - हित विध्वंसी
तेच गोड वाटते जनांसीं आली बकता हंसीं ॥७॥
प्रजा असे विसराळू राया
स्पर्शवेदिनी सत्य म्हणाया
भूत भविष्या नच बघते ती
तिज शिकवावे लागत संतीं ॥८॥
भेटुन वरि वरि परराष्ट्रासी
असे निर्मिला स्नेह तयासी
नृपवश करूनी घेत सुयोधन
गमे तया हा जनहित कारण ॥९॥
निस्वार्थी नी उदारवृत्ती
हस्तक इतरा नित ऐकविती
तोच सुखाचा गमे जनातें
कुणा दुरचें आंतिल दिसतें ? ॥१०॥
यास्तव सोपें नसे युधिष्ठिर
विजय मिळविणे सुयोधनावर
मुळें नृपा ! या विष - वृक्षाचीं
फार खोलवर गेली साचीं ॥११॥
जनांस कौरव आवडती जर
तेच सुखे नांदोत महीवर
हवें कशाला राज्य मला तें
असें न धर्मा आण मनातें ॥१२॥
लोक तुला नच सर्व विसरले स्मरती अजुनी चित्तीं
अशांत म्हणुनी असती कौरव वाटत त्यासी भीती ॥१३॥
सुयोधनानें स्वार्थापोटीं
प्रजा वळविली प्रेयापाठीं
मिळवुन द्यावे श्रेय तयांचे
कार्य असे हें निर्लोभाचें ॥१४॥
द्वारकेस जातो कपिकेतू
विराट - कन्या - परिणय - हेतूं
निजपुत्रासीं अणावयातें
दे त्यासह संदेश हरीतें ॥१५॥
योगेश्वर तो बुद्धिमतांवर
येथ विवाहास्तव आल्यावर
मंत्रबळें होईल तयाएं
विफल सर्वही सुयोधनाचें ॥१६॥
सांगतसे जें तेथ पुरोहित
सहज पांडवा झालें संमत
‘ प्रमाण अपुली आज्ञा ’ म्हणुनी
वाकविती निज - मस्तक चरणीं ॥१७॥
धर्मा करुनी नमन धनंजय निघे द्वारकेलागीं
पवनगतीचे चपल अश्वही गमती त्या लघुवेगीं ॥१८॥
पुरी द्वारका सोन्याची ती
रविकिरणांनीं चमकत होती
प्रहर दोन टळले दिवसाचे
अर्जुन ये मंदिरा हरीचे ॥१९॥
पर्यंकीं श्रीहरी निजेला
अंगावरती घेउन शेला
सोनसळी तो पदर तयाचा
निश्वासें हळुं हालत साचा ॥२०॥
नयन निमीलित तरिही सुंदर
पुष्ट भुजेवर ठेवियलें शिर
सरळ बाहु आजानु दुजा शुभ
शय्येवरतीं रुळतें कौस्तुभ ॥२१॥
उच्चासन घेऊन उशासीं
असे सुयोधन खल मदराशी
सळ नयनीं, वळवीत मिशांना
तुच्छ जणूं मानी सकलांना ॥२२॥
सुयोधनासी बघतां क्षणभर अर्जुन थबके दारीं
गमे तया धनराशी जवळी जणुं कां नाग विखारी ॥२३॥
जवळी येउन चरणा सन्निध
उभा ठाकला मग विजयायुध
नम्रपणें जोडिले करासी
उठुनी बसले तों हृषिकेशी ॥२४॥
वदती विजया हर्षित - हृदयें
“ दूर असा कां बैस इथे ये
प्रिय सखया आलास कधीं तूं
काय धरियला मनांत हेतु ” ॥२५॥
‘ विनवाया तुज ’ म्हणे किरीट
तोच आडवुन म्हणें कुहीटी
“ मदीय परिसे वचन रमाधव
प्रथम इथें मी आलों यास्तव ॥२६॥
प्रथम येत जो त्या तोषविणें
मान्य करोनी त्याचें म्हणणें
तुज ठावी ही सज्जनरीती
श्रेष्ठ म्हणुन तव पूजा होती ” ॥२७॥
“ तुला कौरवा केव्हांपासुन सन्नीतीची महती
पटली, झालें फार बरें वा ” ! हसुन म्हणे श्रीमूर्ती ॥२८॥
“ प्रथम जाहलें तुझें आगमन
प्रथम पाहिला मी परि अर्जुन
म्हणुनी मजसी उभयांचेंही
प्रिय - संपादन अवश्य होई ॥२९॥
भावि रणास्तव हवें तुम्हातें
सहाय्य मम हें कळतें मातें
दोन दिशा मी तुमचें पुढती -
ठेवित, घ्यावी जी आवडती ॥३०॥
पूर्ण निरायुध एक असा मी
‘ नारायण ’ मम सैन्य दुजें हें
शूर सज्ज जे विशाल आहे ॥३१॥
ग्रहण हवें तें करणें यांतुन
असे धाकटा तुम्हांत अर्जुन
संधी पहिली म्हणुन तयासी
चोजविणें प्रथमतां शिशूसी ” ॥३२॥
व्यकुळ झाला मनीं कृपण तो “ मागे अर्जुन काय
सेना जातां, घेउन कृष्णा काय करूं मी हाय ” ॥३३॥
त्यजी परिस जड मुरडून नाकीं
निवडि गारा बघुन चकाकी
दूध टाकिलें थुंकुन ओठीं
लाळ घोटितो मद्यासाठीं ॥३४॥
सूज्ञ परी टाकून पसारा
मूळ सूत्र घे करूनि विचारा
म्हणे धनंजय “ हवास तूं मज
शस्त्र न धरिसी तरी अधोक्षज ॥३५॥
कुरूराजा बहु हर्षित होई
“ म्हणे मूढ हा नच चतुराई ”
रुची कीड्यांची हंसा नाहीं
पाहुन बगळा करितो ही ही ॥३६॥
कौरव विनवी बलरामातें
तो न करी परि साह्य कुणातें
म्हणें “ सारखे दोघेही मज
विरुद्ध त्यांतुन होत गदाग्रज ॥३७॥
तव पक्षानें प्रिय बंधूसह लढणें दुःसह मजसी
येथ तईं नच वसेन जातों तीर्थाटन करण्यासी ” ॥३८॥
पुरा गजाह्वय परते राजा
वदे हरी “ मी कुठल्या काजा
कां म्हणुनी विजया मजलागी
घेतलेस तूं मागुन वेगीं ॥३९॥
देई उत्तर विनयें अर्जुन
दुजें नको मज तुझ्या कृपेविण
तं ज्या अपुल्या म्हणसी हृदयें
स्वयें त्याकडे श्री, यश जय ये ॥४०॥
कुरू - राजाच्यामुळेंच हेही
भाग जाहलेम वदणें पाही
न मागतां तरि मुलास आई
काय दयाळा सोडुन जाई ॥४१॥
या करितां नच मी आलेला
मत्स्यपुरा परि तुज नेण्याला
अभिमन्यूचे लग्नासाठीं
सर्वहि आतुर तुझिया भेटी ॥४२॥
विराट कन्या शुभा उत्तरा कलावती गुणशाली
भाच्यासी तव वधु नेमियली सर्व सिद्धता झाली ॥४३॥
रणविद्या तूं अभिमन्यूसी
स्वयें दीधली अनुपम ऐसी
लतितकलांचीमम शिष्या ती
परस्परां हे भूषण होती ॥४४॥
श्रीकृष्णासी झालें बहुसुख
उत्सुक देवी बघण्या सुनमुख
निघे पुरींतुन वर्‍हाड सत्वर
लग्नाकरितां विशाल सुंदर ॥४५॥
शृंगारित रथ अभिमन्यूचा
सभोंवतालीं गण ललनांचा
कांतीनें ज्याचिया तनूचें
तेज गमे निस्तेज हिर्‍याचें ॥४६॥
नवरदेव तो खुले तयांनीं
जयंत जैसा सुरांगनांनीं
नीति श्री धृति कीर्तीनें वा
वीर जसा शोभून दिसावा ॥४७॥
हत्तींवरच्या अंबार्‍या त्या शिखरें जणुं मेरूचीं
चमकत होतीं सूर्यकरांनीं झूलहि भरगच्चीची ॥४८॥
हिरे मानके पांच मण्यांनीं
भूषविले जे कनक नगांनीं
अश्व असे तेजाळ सुलक्षण
पथें चालतां करिती नर्तन ॥४९॥
ध्वजा रथाच्या नभीं फडकती
असंख्य सुंदर ज्या विविधाकृति
रम्य फुलांनीं हें नटलेलें
सजीव कानन जणुं कीं चाले ॥५०॥
सती सुभद्रा सती रुक्मिणी
तशाच दुसर्‍या श्रीहरिरमणी
रमा शारदा सावित्रीसम
पवित्र पावन ज्यांचा विभ्रम ॥५१॥
रथांत एक्या नर - नारायण
सस्मित चाले प्रेमळ भाषण
त्यांतिल गोडी चाखायास्तव
भंवती फिरती सात्यकि उद्धव ॥५२॥
वनमालीची वैभवशाली सेनाआली या रीतीं
वाजत गाजत सुरसरितेसम साजत जी का भूवरतीं
करी स्वागता थाट, समुत्सुक विराट गाती भाट जया
धरी मुरारी उरीं नृपासी जरी वाकला धरुनि नया ॥५३॥
“ दिष्ट्या त्वं वर्धसे युधिष्ठिर
सत्य निष्ठया ” वदे रमावर
प्रभा तुझी ग्रहमुक्तरवीसी
उजळवील कीं पुनः महीसी ॥५४॥
अर्ध्यादि स्वीकारुन पूजन
वसे मंदिरीं रम्य दयाघन
पुढें उत्तरा अभिमन्यूचा
विवाह झाला बहु थाटाचा ॥५५॥
मनीं सर्वही हर्षित झाले
मिष्टान्नानें याचक धाले
आहेरासी करी रमावर
गणती त्यांची करणें कुठवर ॥५६॥
हत्ती घोडे रथ सोन्याचे वस्त्रें बहुमोलाचीं
कुबेर लज्जित व्हावा ऐशी राशी नवरत्नांची ॥५७॥
पांडवपक्षी नृप जे तेथें
द्रुपद मगध पुरुजितादि होते
दंप्तीस पूजिले तयांनीं
अमोल सुंदर वस्त्राभरणीं ॥५८॥
समारंभ तो सरल्यावरतीं
राजसभेसी बसले नृपती
रत्नें मंडित शुभासनासी
वदे तयांना मग हृषिकेशी ॥५९॥
“ नृप हो द्या अवधान जरासें
घ्या निर्णय जो समुचित भासे
सदाचार सन्नीति तुम्हासी
गमे प्राणसी सदा हवीशी ॥६०॥
अन्यायाची चीड तुम्हांसी
बोलतसे मी या विशासीं
नको सांगणें इथें नव्यानें
कसें कपट केलें शकुनीनें ॥६१॥
सरळ मनाच्या युधिष्ठिरा तो नडुन कपट द्यूतें
धृतराष्ट्रासी वश करुनीया धाडी वनवासातें ॥६२॥
कोण फेडितो स्वप्नांतील ऋण
हाल सोसुनी द्यूताचा पण
सत्यनिष्ठ हा परी युधिष्ठिर
शिणला वर्षे तीन दहांवर ॥६३॥
उदार - कीर्तीं हरिश्चंद्र नल
धर्म असे हा त्या मालेंतील
राजर्षी हा विपदा भोती
जसा कुणी बलहीन अभागी ॥६४॥
विजयी हा गांडीव धनुर्धर
श्रेष्ठ जयाहुन एकच शंकर
भूमीलाही उलथायाचें
अपार बल कीं या भीमाचें ॥६५॥
सूत माद्रिचे हे बलशाली
एरि सकलीं मुख घालुन खालीं
भोगियले दुःसह हाला या
पण धर्माचा सत्य कराया ॥६६॥
पुरी प्रतिज्ञा केली अपुली धैर्यें पंडुसुतांनीं
अवश्य आहे मिळणें आतां राज्य तयां परतोनी ॥६७॥
वडिलोपार्जित राज्य असें हें
उभयां त्यावर सत्ता आहे
कौरव जरि ते सरळपणानें
देतिल ना तरि अनर्थवाणें ॥६८॥
धर्माच्या या उदारहृदयीं
क्षमाच आहे शत्रूविषयीं
विनाश व्हावा सुयोधनाचा
लवही नाहीं भाव तयाचा ॥६९॥
न्याय परायण नृप हो यास्तव
विचार कांहीं सांगा अभिनव
कौरव पांडव या दोघांहीं
जया मुळें अन्याय न होई ॥७०॥
मनीं वाकड्या कुरुराजाचें
आज काय तें कळत न साचें
गमे पाठवूं म्हणुनी कोणी
दूत विवेकी सुशील मानी ॥७१॥
अर्ध भाग राज्याचा देउन समेट जरिकां झाला
आनंदाची गोष्ट असे ती युद्ध हवें कवणाला ॥७२॥
भाषण ऐकून भगवंताचें
अर्थ - धर्म - युत मृदु समतेचें
साधु साधु बहु योग्य वचांनीं
स्तवन मांडिलें सकल नृपांनीं ॥७३॥
विचार विनिमय करुन घडीभर
द्रुपद करी सकलांस्तव उत्तर
“ पक्ष आपुला असो नयाचा
म्हणुन यत्न हा केवळ साचा ॥७४॥
समेट होईल त्या अधमासी
स्वxxतहि नच पटे अम्हांसी
भुजग कदाचित निर्विष होइल
दुष्टभाव नच कौरव सोडिल ॥७५॥
नाश करावा पंडुसुतांचा
हेत तयांचा फार दिसांचा
अतां न त्याची कींव करावी
सीमा शांतीसही असावी ॥७६॥
उतरेल न मद अंशसुतांचा युद्धावांचुन देवा
धर्मासाठीं ससैन्य आम्ही सिद्ध वेंचण्या जीवा ॥७७॥
चेकितान युयुधान सात्यकी
विराट राजा मत्स्यासह कीं
कुंतिभोज हा पाण्ड्य दुजे ही
नृपती यासी संमत पाही ॥७८॥
दंड यमाचा योग्य खला या
संधि तरीही हवा कराया
दशननासम असुरासींही
रघूत्तमें संधी दिधली ही ॥७९॥
परी आमुची विनवी आहे
तुम्हीच घ्यावें कार्य शिरीं हें
कुरूराजासी निजप्रभावें
कसें दुज्यांनीं उपदेशावें ॥८०॥
सभेमधे ज्या श्रीभीष्मादिक
तेथे तुम्हीची उन्नतमस्तक
चतुरपणा ये चातुर्यासी
अपणाजवळी हें हृषिकेशी ॥८१॥
सूर्यशतापरि तेज आपुलें श्रुतिसम पावन वाणी
विचार करितां सामर्थ्याचा गमता पिनाक - पाणी ॥८२॥
आपणची जा श्रीयदुनाथा ”
वदले सर्वहि नमवुन माथा
“ होय बरें ” म्हणती जगजेठी
दूत जाहले भक्तासाठीं ॥८३॥
हर्षित झाले सकलहि राजे
वदती “ कळवा घडेल जें जें
आज्ञा व्हावी अम्हांस तोंवर
कथितां होऊं सेवे सादर ” ॥८४॥
निज नगरासी जाई नृपगण
पाण्डव आणि श्रीमधुसूदन
परस्परीं करितात विचारा
प्रश्न कसा हा सुटेल सारा ॥८५॥
विवेक नुरला सुत मोहानें
लवही ज्या त्या धृतराष्ट्रानें
संजय नामें दूत आपुला
उपप्लव्य नगरास धाडिला ॥८६॥
‘ भेद काढणें युधिष्ठिराचा पाहुन बलावलासी
युद्धापासुन विन्मुख करणें ’ बोधियलें हें त्यासी ॥८७॥
वंदन करुनी पंडुसुतांना
कुशलें त्यासी पुशिलीं नाना
अपुलीं हीं त्या सांगुन साचीं
बोलत वाणी धृतराष्ट्राची ॥८८॥
“ नित्य असो कल्याण आपुलें
साम घडावा हेंच चांगलें
मूर्ख परी मम सुत दुर्योधन
बसला आहे हट्टा पेटुन ॥८९॥
तो कवणाचें मानित नाहीं
परी तसें ना तुमचें कांहीं
तुम्हें जाणतें अहांत सारे
युद्ध करा नच हें अविचारें ॥९०॥
पाट वाहवुन नर - रक्ताचे
काय तरी सुख या राज्याचें
विषय सुखाचें नसे प्रयोजन
निभेल तुमचें परभृत होउन ॥९१॥
मूर्खासंगें मूर्ख न व्हावें ही सुजनांची रीती
सहजशीलता पंडु - सुतांची असामान्य ही ख्याती ॥९२॥
म्हणे कोपुनी कंस - निबर्हण
“ दूता आवर हें तव भाषण
धर्म न कारण या नाशासी
कसें दिसें परि हे अंधासी ॥९३॥
पांडवांस या कथिसी भिक्षा
चोरा सोडुन धन्यास शिक्षा
अम्ही जाणतों धर्म अधर्मा
नृपनीतीच्या तसेंच मर्मा ॥९४॥
परतुनियां जा क्षमा असे तुज
दूत दंड्य ना म्हणे अधोक्षज
मीच येउनी गजनगरासी
स्वयें सर्व मांडीत सभेसी ” ॥९५॥
सर्वां चरणीं ठेवुन मस्तक
परता झाला अपाप सेवक
दूत म्हणोनी भगवंताची
होत सिद्धता निघावयाची ॥९६॥
सूर्यासम दैदीप्य रथासी अश्व चार तेजस्वी
ध्वज गरुडांकित फडके वरतीं दारुक विनयें विनवी ॥९७॥
धर्मराज विनवी विनयेंसी
सर्व समर्था हे हृषिकेशी
करी न भाषण तेथ विरोधी
कसाहि हो परि सामच साधी ॥९८॥
हट्ट धरी जरि फार सुयोधन
दुखवूं त्यासी नको अवर्जुन
पांचचि गावें पुरेत मातें
राज्य तयासी लखलाभों तें ” ॥९९॥
“ युद्ध शक्य तोंवरि टाळावें ”
म्हणे धनंजय वत्सल भावें
“ सर्वहि साधे यत्न बळावर
सांगू तुज मी काय रमावर ” ॥१००॥
कभिन्न काळा कठोर कातळ
अवचित पाझरणें त्यांतुन जल
तेवीं तापट भीम म्हणाला
“ साम करावा तिथें दयाळा ॥१०१॥
रक्तपाद होवो न महीवर जन नांदोत सुखानें
युद्ध कराया मन नेघे मम ” बघत हरी नवलानें ॥१०२॥
खैराचा अंगार निवावा
पर्वत जेवीं हलका व्हावा
शेळपटे वा सिंह वनींचा
भाव तसा हा वृकोदराचा ॥१०३॥
कृष्ण बोलला त्या उपहासुन
होय कसें विपरीत विलक्षण
धगधगती संतप्त भावना
विझली भीमा कशी कळेना ॥१०४॥
कोठें गेला तुझा पराक्रम
कीचकादि खल जनास जो यम
अंधसुताच्या मांडीवरती
आदळणारी गदा कुठें ती ॥१०५॥
पक्षाघातें गळले बाहू
कीं भ्रम झाला तुज हें पाहूं
तुझा भरवंसा मजसी होता
अवसानीं या करिशी घाता ॥१०६॥
भीम उत्तरे शांतपणानें देवा म्हण कांहीं तूं
भरतकुलाचा नाश न होवो हाच मनींचा हेतू ॥१०७॥
सती द्रौपदी हें संभाषण
ऐकत होती दूरी राहुन
शांतपणा हा त्या वीरांचा
भाल्यासम तिज रुतला साचा ॥१०८॥
दुःखानें त्या परि संतपएं
मानधना ती थरथर कांपे
उरीं हुंदके समावती ना
श्वास शिणविती नाकपुड्यांना ॥१०९॥
लाल तांबड्या नयनांमधुनीं
स्रवे क्रोध जणु जलरूपानीं
गाल पोळले अश्रूनीं त्या
बटा कचांच्या मुक्तचि होत्या ॥११०॥
केंस मोकळे धरुनी हातीं
शोकावेगें वदे सती ती
आठव करुनी या केसांचा
यत्न करावा मग सामाचा ॥१११॥
अपमानाचें जगणे जीवन हें का फल धर्माचें
अतां सह्य नच होत मला हें सत्य सांगते वाचें ॥११२॥
राज्य नको जर असेल यासी
पुरा गजाह्वय कशास जासी
पांच तरी कां हवींत गांवें
भिक्षा मागुन सुखें जगावें ॥११३॥
त्रैलोक्या जिंकील बळानें
शौर्य होत तें केविलवाणें
वेष, वर्ष जो धरिला होता
भिनला कीं तो हृदयीं आतां ॥११४॥
भैरवता नांवातच केवळ
थिजली वृत्ती मरगळलें बळ
रिपुमर्दन करण्याचें सोडुन
बसा सुखें जपमाळा घेउन ॥११५॥
जळो शांतता युधिष्ठिराची
धिक धिक् यश किर्ती विजयाची
अर्थ न उरला भीमबळा या
विडंबिती खल ज्यांची जाया ॥११६॥
तेरा वर्षे धुमसत आहे मम हृदयीं जो अग्नि
रिपुरुधिराच्या अभिषेकाविण तो नच जाय विझोनी ॥११७॥
बलशाली ते पांचपुत्र मम
अभिमन्यू हा अतुल पराक्रम
लोळवुनी कौरवा महीव
निववितील हें जळतें अंतर ॥११८॥
मीच करंटी ये जन्मासी
कशास देऊं दोष कुणासी
तुम्हांस पडतो मोह शमाचा
खेळ असे हा हतदैवाचा ॥११९॥
शोक करी ती साध्वी विह्वल
द्रवेल ऐकुन वज्र शिलातल
तिला शांतवी मग वनमाली
दुर्दिन सरलें तव पांचाली ॥१२०॥
भीमार्जुन हे तव शत्रूंची
रणीं दुर्दशा करतिल साची
मान न देती मम वचनाला
विनाश त्यांचा मग ओढवला ॥१२१॥
सम्राज्ञी होशील पुनः तूं
समर्थ आहे हा कपिकेतू
विदीर्ण होतिल शतधा कौरव
असत्य माझी गिरा नसे लव ॥१२२॥
निरोप घेउन या परि चढले रथावरी भगवंत
सवें सत्यकी विश्वासाचा श्रेष्ठ वीर धीमंत ॥१२३॥
काल रम्य तो ऋतु शरदाचा
त्रास न होई पथें धुळीचा
दिसे वनश्री उह्लसिता ती
वरांगना जणु न्हाली होती ॥१२४॥
डुलती सुफलित विस्तृत शेतें
जणों वंदितीं भगवंतातें
सूर्य करांनीं विकसित पद्म
जशी यशःश्री निवास सद्में ॥१२५॥
सज्जन - हास्या परी सुनिर्मळ
शोभत होतें तळ्यांतलें जल
शुभ्र हंस गण आंत विलासे
पवित्रतेचें वाहन जैसें ॥१२६॥
अजें दुजें ना लव शरदासी
सुंदरता दे सकल तरूंसी
पूर्ण - यौवना वररमणीसम
हरित - पटावृत अवनी अनुपम ॥१२७॥
शुभ्र पांढरे मेघ तरळती नील नभासी कोठें
फेनपुंज सागरावरी जणु वायु डुलवी वाटे ॥१२८॥
निरपवाद शोभा शरदाची
निजदृष्टींनें खुलवित साची
कुरुनगरा प्रभु पोंचे येउन
उभा स्वागता असे सुयोधन ॥१२९॥
पायघड्या पसरल्या पथावर
रत्नांचे वर तोरण सुंदर
घुमती मंजुल मंगल वाद्यें
चारण गाती स्वागत पद्यें ॥१३०॥
दुर्योधन शकुनी दुःशासन
वंदन करिती आदर दावुन
विनती करिती कृत्रिम भावें
“ यदुराया मंदिरी चलावें ॥१३१॥
सहा ऋतूंच्या सुख सौंदर्या
एकदांच ये उपभोगाया
जिथे असा तो हर्म्य मनोहर
दासी मोहक सेवे तत्पर ” ॥१३२॥
उपहारा हरि नसे भुकेला शुद्ध भाव त्या रुचती
वररंगानें भुलेल का तो हृदयीं ज्याची वसती ॥१३३॥
“ सस्मित वदती सुयोधनासी
श्रम करिसी हें व्यर्थ कशासी
द्वारेचा मी आज न राजा
आप्तपणा नच तुमचा माझा ॥१३४॥
प्रियभक्ताचें करण्या रक्षण
दूर सारिली लाज गोत - धन
दास असे मी पंडुसुतांचा
घेउन आलों निरोप त्यांचा ॥१३५॥
तूं राजा मी दूतचि केवळ
विदुरासदनीं असें मला स्थळ
‘ असो पाहुणा सम अधिकारी
असे सांगती लोक विचारी ” ॥१३६॥
“ भोजनास तरि निदान यावें मम सदनीं यदुनाथा ”
लगट करी तो खल दुर्योधन विनवी लववुन माथा ॥१३७॥
म्हणे मुरारी त्या झिडकारुन
योग्य मानिती तदाच भोजन
जिथें प्रेम तें असतें उत्कट
धनहीना वा येतां संकट ॥१३८॥
फार शिरूं की नये खोलवर
ऐक सांगतो स्पष्ट हवें तर
कुंठलीही मज नसे विपत्ती
तुझी नि माझी लव ना प्रीती ॥१३९॥
रथ घे विदुराघरी दारुका
ऐकुन बसला खलास चरका
मनांत भारी जळफळले ते
सुधा वर्षली विदुरावरतें ॥१४०॥
वळे दयाघन भाग्यसमीरें
धन्य धन्य हे नाथ मुरारे
साध्वी त्याची घे लोटांगण
कुंती माता दे आलिंगन ॥१४१॥
प्रेमळ वत्सल गुज गोष्टींनीं
दीर्घ तरी ती सरली रजने
निरोप धाडी नृपा जनार्दन
येऊं कधी मी भेटी लागुन ॥१४२॥
दुसरे दिवशीं राजसभेसी शिनिवीरा सह येई
वासुदेव भगवान रमाधव संतजना सुखदायी ॥१४३॥
श्यामल कांती नवजलदासम
धीर गती सुचवीत पराक्रम
नतजनतारक रम्य पदें तीं
जणुं फुललीं कमलें भूवरतीं ॥१४४॥
पीतांबर हा बहुमोलाचा
लखलख चमके कांठ जयाचा
शोभत शेला अंगावरती
पदरा जडलें माणिक मोतीं ॥१४५॥
गजशुंडेपरि अ जा नु बा हू
धजती ना खल तयास पाहूं
दीप्त रवीसम हृदयीं कौस्तुभ
कोमल ओठीं हास्य खुले शुभ ॥१४६॥
डुलते कानीं सुरेख कुंडल
स्कंधीं रुळती कुरळे कुंतल
तिलक केशरी मृगमदमिश्रित
मुगुट शिरींचा तेजे तळपत ॥१४७॥
असा मनोहर योगविदांवर येता परिषत्स्थानी
उभे राहुनी स्वागत केले भीष्मासह सर्वांनीं ॥१४८॥
सुवर्ण मंचक रत्नें मंडित
पादपीठ ज्या असे सुशोभित
तेथ आदरें समापतीसी
बसवी राजा नम्रवचेंसी ॥१४९॥
सर्व सभासद बसले खालीं
वृत्ती त्यांची उत्सुक झाली
परमेशाचें श्रवण्या भाषण
उठतां श्रीहरि शांत सभाजन ॥१५०॥
“ कुरुकुल - तिलका धृतराष्ट्रा हे
सख्य करूं मी आलों आहे
कौरव पांडव या दोघांचें
भलें असो हें हेत मनींचे ॥१५१॥
वंश असे हा श्रेष्ठ कुरूंचा
वचक दूरवर असे जयाचा
वंशाची या उज्वल कीर्ती
सुरलोकींही किन्नर गाती ॥१५२॥
मलिन न व्हावे यश ऐसे हें म्हणुनी सावध राही
मिथ्या वर्तन करणारासी स्वतंत्रता बरि नाहीं ॥१५३॥
तुझे लाडके पुत्रचि येथें
डाग लाविती कुलकीर्तीतें
धर्मार्थासी हे अवमानुन
करूं पाहती नृशंस वर्तन ॥१५४॥
दुर्बल लवही नसती पांडव
शांत राहिले प्रेमानें तव
तुझेच ते त्या जवळ करावें
हेंच विनविले तयीं सुभावें ॥१५५॥
धर्म म्हणे तुज ‘ हें प्रिय ताता
दुजा आसरा अम्हां न आतां
तुम्ही आमुचे वडिलांमागें
लालन पालन केलें अंगें ॥१५६॥
दुःख साहिलें तव आज्ञेनें
समय पाळिला सर्व नयानें
जागा आतां निज वचनासी
राज्य करावें परत अम्हांसी ’ ॥१५७॥
पंडू सुतांचा असा असे हा निरोप भूपा तुजसी
अपार शक्ति असुनी अंगी विनम्र ते गुणराशी ॥१५८॥
कथितों राजा तुझ्या हिताचें
अर्ध - राज्य दे पंडुसुतांचें
युद्धाची ती वेळ न आणी
सर्व - नाश होईल निदानी ॥१५९॥
जय मिळवाया कौंतेयावर
समर्थ नाहीं कुणी सुरासुर
राजा त्यासह सख्य करावें
जगताचे हित यांत समावें ॥१६०॥
सांगा हो मज तुम्ही सभाजन
द्रोणा भीष्मा करा निवेदन
बोलत का मी अन्यायाचें
असत्य शिवलें ना मम वाचें ॥१६१॥
धर्म जाणती तुम्ही विचारी
उत्तरदायी अहांत सारीं
निर्णय घेतां अन्यायाचे
सभासदांसीं पाप तयांचें ॥१६२॥
निग्रह करूनि तव पुत्राचा समेट राजा साधी
धर्म युधिष्ठिर तव आज्ञेसी नाहीं लवहि विरोधी ॥१६३॥
धर्मनीतियुत वच समयोचित
ऐकुन झाले जन रोमांचित
भीष्म पितामह वदले तेव्हां
“ सकल हिताचा बोल हरी हा ॥१६४॥
धृतराष्ट्रानें उत्तर केलें
श्रेयस्कर तव भाषण सगस्ळें
काय करूं परि सुतासमोरी
गुंग होत मम बुद्धी सारी ॥१६५॥
धरी दुराग्रह मूर्ख सुयोधन
रुचते ना मज त्याचे वर्तन
उपाय परि मम चालत नाहीं
तूंच पहा त्या सांगुन कांहीं ॥१६६॥
सर्वंकष तव कुशाग्र बुद्धि
वश असती तुज सकला सिद्धि
चतुर भाषणी तूं यदुराया
बोध करी हट्टी तनया या ” ॥१६७॥
“ फार बरें ” मधुसूदन वदले “ कुरुराया तुजसाठीं
सुयोधनासी बोधिन ’ म्हणती ‘ ऐक हिताच्या गोष्टी ॥१६८॥
कुलदीपक तूं कुरूवंशाचा
परिचय आहे तुज विद्यांचा
ज्ञान असे तुज भल्या बुर्‍यांचें
वचन मोडिसी कां वडिलांचें ॥१६९॥
अवगणितां हितचिंतक बाप्पा
कारण होतें पश्चातापा
दुराग्रहा बळी पडुनी पाही
कुलक्षया नच कारण होई ॥१७०॥
कामाहुन अर्थाची महती
अर्थ अकिंचन धर्मापुढतीं
अधिष्ठान हें कधिं नच टाकीं
हित साधावें इह परलोकीं ॥१७१॥
द्वेषा करिसी जन्मापासुन
पंडुसुतांच्या तूं निष्कारण
क्षमाच आहे त्याचे हृदयीं
परी तियेचा अंत न पाही ॥१७२॥
क्रोध न आला युधिष्ठिरासी अर्जुन धनु ना चढलें
तोंची निजहित साध सुयोधन ! वा संकट ओढवलें ॥१७३॥
याच परी भीष्मद्रोणांनीं
बोध तया केला विदुरांनीं
परी सुयोधन बहु अभिमानी
वाक्य कुणाचें लव नच मानी ॥१७४॥
क्रोध तयाचा उसळूनि यावा
म्हणे “ माधवा कळला कावा
ढोंग दावुनी निःस्पृहतेचें
हित केवलो तूं बघसी त्यांचें ॥१७५॥
बोधाची कां उगी उपाधी
लवही नाही मी अपराधी
द्यूतीं मजसी विजय मिळाला
नसे कुणाचा मी ओशाळा ॥१७६॥
पोसुन माझ्या अन्नावरती
द्रोणभीष्म मज उलटे कथिती
धाक घालिसी हरी कुणासी
भीत न मी त्या बृहन्नडासी ॥१७७॥
राज्य राहुंदे सुइच्या वरची देइन ना मातीही
समरीम मृत्यू येइल येवो मज वीरा भय नाही ॥१७८॥
म्हणे जनार्दन “ बरें तथास्तु
वीर वृकोदर पुरविल हेतू
वीरशयन तुज मिळेल निश्चित
तदा न मागें घे यत्किंचित ॥१७९॥
निर्दोषी मानिसी स्वताला
पहा शोधुनी निज चित्ताला
घातियलेंसी विषान्न भीमा
जाळाया यतलास तया मा ॥१८०॥
सती द्रौपदी तुझी भावजय
तिला गांजिले सोडुनियां नय
सभेंत धजसी करण्या उघडी
तदाच भरली तव पूर्ण घडी ॥१८१॥
तुझिया पापा गणती नाही
त्यजिलें सत्य न पंडुसुतांहीं
एकच झाली चूक तयांची
तुला ठेविलें जिवंत हेंची ॥१८२॥
सुधारिली ती जाईल आतां सुचली तुज दुर्बुद्धि
मत्सामर्थे संतजनांचे हेतू नेइन सिद्धीं ॥१८३॥
कथितों अंती धृतराष्ट्रा तुज
उच्चरवानें म्हणे अधोक्षज
बंदित घाली सुताधमा या
मोहासी वश होइ न वाया ॥१८४॥
कुल रक्षाया वधणें व्यक्ति
गांवासाठी कुलास मुक्ति
त्यजणें गांवहि देशासाठीं
सूज्ञ जनांची ही परिपाटी ॥१८५॥
कंसा वधिलें मी ज्ञातीस्तव
प्रजापतीनें दमिले दानव
तसें त्यागुनी सुतमोहासी
साध - देश - कुल कल्याणासी ॥१८६॥
असें ऐकतां हरिचें भाषण
कर्ण ठाकला गर्वे ताठुन
वदे सभेसी धिक्कारुनियां
हात उचलतो कोण बघूं या ॥१८७॥
दुर्योधन नृपवरा तुम्हासी
साह्य सदा मी असे रणासी
त्रिभुवन - विजयी भार्गवछात्रा
पुढे टिकेल न अत्रपरत्रा ॥१८८॥
तुम्ही उधळुनी द्या हा संधी
विश्वहि सगळे असो विरोधी
बडबड या शठ वाचाळाची
मनांत लवहि न धरावयाची ॥१८९॥
भीष्म म्हणाले गर्जुन कर्णा मूर्खपणा आवर हा
घातक असली भर नच घाली सुयोधनाच्या मोहा ॥१९०॥
गंर्धवानें धरितां राजा
तुझा पराक्रम नच ये काजा
पार्थे केलें मुक्त तुम्हांसी
आठव त्याचा करी मनासी ॥१९१॥
विराट नगरी गोहरणास्तव
होतासी ना ? तूं सह कौरव
गाय न ऐकहि परी मिळाली
उलट नेसतीं वस्त्रें गेलीं ॥१९२॥
तदा एकटा होता अर्जुन
घेसी तरि माघार रणांतुन
डौल दाविसी कशास पोकळ
रणांत ज्याची विद्या निष्फळ ॥१९३॥
सुयोधना तूं ऐक हरीचें
रक्षण करि यश धन विभवाचें
गोता देइल तुझी प्रभावळ
गर्वे जी नित वदते बाष्कळ ॥१९४॥
अपमानाएं समजुन भाषण
कर्ण चालता होत सभेंतुन
संतापें मनिं जळपळलेला
खल दुर्योधन त्या अनुसरला ॥१९५॥
बंधन करण्या श्रीकृष्णासी अधमाधम मनि योजी
म्हणे हरी मी अपवादांतुन मुक्त जाहलों आजी ॥१९६॥
धृतराष्ट्रा हे परिषज्जन हो
बोल अम्हावर अता न राहो
भोगा आतां परिणामासी
संहारी या तुम्हेंच दोषी ॥१९७॥
मूर्ख पाहतो मज निगडाया
समर्थ नाहीं भुवनत्रय या
अजुनी आज्ञा दे मज राजा
शासन करितो तुझिया तनुजा ॥१९८॥
तुझ्या कडुन परि घडेल ना तें
लिखित विधीचे वृथा न होतें
नारी घेतिल मुखांत माती
रडतिलफिरतिलबडवितछाती ॥१९९॥
असो पुरे हें बोलूं कायी
कार्य अतांमम उरलें नाहीं
परिषज्जन हो आज्ञा द्या मज ”
वदे सवंदन देव अधोक्षज ॥२००॥
सात्यकिचा कर धरुनी त्यजिती सभाग्रुहा भगवंत
दीप्त तेज ते पाहुन थिजले खल चित्ती भयभीत ॥२०१॥
हरि, विदुराचा निरोप घेउन
करीत कुंतीसी अभिवाद्न
जननी वृद्धा वदें तदा ती
तेज जणूं का जळती ज्योती ॥२०२॥
“ सुतांस माझे कळिव शुभाशी
आलिंगन प्रिय पांचलीसी
सांग तया संदेश विभो मम
रणांत दावा अपुला विक्रम ॥२०३॥
अर्थ न कळताम विप्र जसे का
वेद ऋचांचा करिती घोका
तत्व विसरुनी तसे युधिष्ठिर
धर्म धर्म नच सांगे वरवर ॥२०४॥
रक्तपात करणें दुष्टांचा
अधर्म यांत न लवही साचा
हेंच कर्म कीं करण्या करतां
निर्मी क्षत्रिय - जात विधाता ॥२०५॥
सून लाडकी सुशील माझी
अधम तिला भरसभेंत गांजी
झाल्यावांचुन त्याचें शासन
मुख तुमचें मी कधीं न पाहिन ॥२०६॥
राज्य रक्षिती बाहू ज्यांचे
पुत्र तुम्ही त्या वीर पित्याचे
संपादा श्री, वडीलोपार्जित
तरीच मानिन तुम्ही वीरसुत ॥२०७॥
धर्माधर्मे भ्रांत जनास्तव
जन्म होतसे भगवंता तव
उचित असें तें करी मुरारी
घातियलें तनयां तव पदरीं ॥१०८॥
“ आज्ञेनें तव वर्ततील जननी धर्मादि ” सांगे हरी
पाठी राहुन साह्य मी करिन गे पुत्रा तुझ्या संगरीं
राजा धर्म पुनः दिसेल तुजसी सम्राट सिंहासनीं
धर्माधिष्ठित शासनांत जगता शांती मिळे जीवनीं ॥२०९॥

‘ शमोद्योग ’ नांवाचा पंधरावा सर्ग समाप्त

लेखनकाल :-
आश्विन शके १८७१

N/A

References : N/A
Last Updated : December 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP