भगवान गोपालकृष्ण - अध्याय ७ वा

प्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.


नम: परम कल्याण नम: परम मंगल । वासुदेवाय शांताय यदूनां पतये नम: । गताध्यायीचे अनुसंधान । राखोनी पुढील कथा कथन । भक्तीभावे तुम्हां करीन । श्रोतृजन ऐकावे ॥१॥
महाराजांचे एक प्रवचन । भावार्थी जयाचे विवेचन । हेत ऐसा मनीं योजून । हा अध्याय लिहिला असे ॥२॥
शिवालय पांजरा कांठीचे । वाटुं लागले गैरसोयीचे । म्हणोनी कार्यक्रम प्रवचनाचे । होऊं लागले शहरांत ॥३॥
खोळ गल्लीतील राममंदीर । होतें प्रशस्त आणि सुंदर । तेथेच प्रवचनें ज्ञानेश्वरीवर । करीत महाराज यापुढें ॥४॥
महाराजाचें निरुपण । जणूं अमृताचे सिंचन । तृप्त होती आर्तश्रवण । भक्तीसुधा पिवोनी ॥५॥
श्रोतवृंद अपार । भरोनी राहिला मंदीर । प्रवचनासी झाला अधीर । केशवदत्त प्रभुंच्या ॥६॥
राममंदीराच्या परिसरांत । प्रवेशंता केशवदत्त । दाटी लोटली अद्भुत । पादवंदनासी तयांच्या ॥७॥
होऊनी मग आसनस्थ । म्हणाले प्रभु केशवदत्त । प्रभुचिंतनी एक-चित्त । व्हावें श्रोतेसज्जन हो ॥८॥
राधे गोविंद राधे गोविंद । वाजवा टाळी एकसंघ । होऊं भजनी सकळ दंग । माधव मुंकुद मुरारीच्या ॥९॥
विष्णव संताचे श्रेष्ठत्व । तयांच्या कार्याचे महत्व । विश्वशांतीचे आदितत्व । विषय आज प्रवचनाच्या ॥१०॥
अखिल जगाच्या विकासाची । आदि जननी जाणा एकची । संस्कृति केवळ भारताची । अन्य न कुठली साधका ॥११॥
तिच्या ज्ञानाचा प्रकाश । प्रकटला आहे सर्वत्र । साहित्य ग्रंथादि वाङ्मयांत । नीतिमत्तेचेहीं जगाच्या ॥१२॥
जगताकडे सवत्सल । धेनु हृदये निर्मल । पाही सदा केवळ । संरवाङ्मय भारताचे ॥१३॥
पवित्र आणि तेजस । विचारांचा सुधारस । या देशीच निखालस । स्त्रवला संतमुखानें ॥१४॥
संत जनांची शिकवण । नि:स्वार्थी लोक कल्याण । अभ्युदयाची उभवण । केली संतानी अशेष ॥१५॥
महाराष्ट्र धर्माचे रक्षण । सौख्य शांति नीति सवर्धन । भागवत धर्माचारें करून । साधिले मराठी संतानी ॥१६॥
उस्कटलेली धर्म घडी । बुध्दानंतर अवघडी । बसविली अति सुरवडी । आचार्य आणि संतानीं ॥१७॥
अनंत आपत्तीचें मेघ । आले या देशी संघाट । परि संतवाङ्मय विद्युत । दाखवि प्रकाश धैर्याचा ॥१८॥
या प्रकाशें न्याय सत्ता । संस्कृति, शांतता, स्वायत्तता । राहिली अभेद्य सर्वथा । केवळ कृपा संताची ॥१९॥
सहज लोक भाषेंत । बोलूनी बोल पवित्र । भक्तिप्रेमाचे नवनीत । दिले संतानी सकलांसी ॥२०॥
परांच्या कल्याणार्थ । स्वदेह झिजवूनी सार्थ । जीवन आपुलें कृतार्थ । केले संतांनी कृपाळुवाणें ॥२१॥
“पाणी मुद्दल झाडाजाये । तृण ते प्रसंगी जिये । एका बोलिले होये । सर्वाहि हिता” ॥ज्ञाने ॥ हा संसाररूपी महावृक्ष।
व्याप्ति जयाची सकल विश्व । तयाची पानें, फळे, पुष्प । जगती केवळ मुळाधारें ॥२२॥
परि मूळ म्हणजे नीतिधर्म । विश्वबंधुत्व सुकर्म । शिंपीचा तेच सुवर्म । ‘सुखें’ येती तरारोनी ॥२३॥
याच विचाराचे वर्धन । करिती साधु संतजन । निष्काम कर्म सेवेतून । जग-कल्याण कारणें ॥२४॥
दुष्टदुर्जनांचा काळ । भक्त-जन प्रतिपाळ । आश्रय जयांचा सर्वकाळ । भगवंत तोच जाणावा ॥२५॥
“कृष्णा धांवरे लवकरी । त्रिभुवन हरुषेभारी” । प्रेमवृत्ती ऐसी सकलांतरी । वाढविली केवळ संतानीं ॥२६॥
प्रभुगुणांचे संकीर्तन । जे राखोनी अनुसंधान । वर्तति आपुले जीवन । ते परम् कल्याण पावती ॥२७॥
प्रभुकृपेच्या छत्राखाली । होतील यशाचे तेच वाली । वृथा न ही संतबोली । ग्वाही देति महाराज ॥२८॥
नित्य करितां प्रभुस्मरण । आसक्तिची होईल सोडवण । विश्वप्रपंची दिसेल कृष्ण । सत्य वाणी संतांची ॥२९॥
“मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास । कठिण वज्रास भेदू ऐसे ।
दया तेची नांव भृतांचे पाळण । आणिक निर्दाळण कंटकाचें ॥”
तुकयाचे हे उद्गार । असुद्या मनीं निरंतर । तेणें होईल प्रतिकार । असत्य आणि अधर्माचा ॥३०॥
हीच गीतेची शिकवण । अर्जुनासी केली कथन । ठेवा तयाची आठवण । केशवदत्त म्हणाले ॥३१॥
श्रीकृष्ण जयाचे आराध्य दैवत । ते वैष्णव महासंत । धर्म आणि राष्ट्र संवर्धनार्थ । शिकवण देती कर्तृत्वशाली ॥३२॥
एकनाथांनी परचक्राचा । स्वयें क्षात्रवेष करून साचा । संहार केला रिपुचा । प्रसन्न झाले जनार्दन ॥३३॥
श्रीशिवछत्रपतीनां । स्वराज्याची प्रेरणा । रक्षावया गो ब्राह्मणा । दिली रामदास गुरुंनी ॥३४॥
तुकोबांचे संकीर्तन । रामदासाचे प्रबोधन । येणे शिवशक्तीचे वर्धन । आनंदभुवनीं जाहले ॥३५॥
मावळे मराठे शेतकरी । वारकरी तैसेच धारकरी । एकत्र खङ्ग धरूनी करीं । सज्ज झाले क्षात्रधर्मा ॥३६॥
धर्म आणि राजकारण । कौशल्यें ऐक ठायीं गुंफून । स्वराज्याचे सुराज्य करून दाखविले संत मंडळीनीं ॥३७॥
मऊ मेणासारिखे । प्रसंगी होती वज्र जैसे । देश कार्य परत्वे । वर्तती संत सर्वत्र ॥३८॥
जे जे ज्याचे विहित कर्म । आचरावे पाळुनी सतधर्म । जीवनाचे हेच वर्म । अन्य न दुसरें संत म्हणती ॥३९॥
शांति, क्षमा, तपज्ञान । श्रध्दा विग्रह विज्ञान । पावित्र्य ऋतुजा ब्रह्मकर्म । ब्राह्मण तेची स्वभात: ॥४०॥
शौर्य, धैर्य, प्रजारक्षण । रणीं झुंजणें रिपुहनन । दातृत्व, दक्षता सुलक्षण । हाची धर्म क्षत्रियांचा ॥४१॥
शेती, व्यापार, गोरक्षण । स्वभावत: हे वैश्य कर्म । सेवाभावे अखंड वर्तून । राहणें उचित शुद्रांसी ॥४२॥
जे ऐशा कर्म विभागीं दक्ष । लाभेल तयांना अंती मोक्ष । अनुभवाची ही साक्ष । संत देती गीतेची ॥४३॥
भगवंताची ही शिकवण । भारती अखंड घुमवून । चातुवर्ण्य समाजाचें संघटण । केले कुशल संतानीं ॥४४॥
ज्ञानदेव, नामदेव । संत महा वैष्णव । भक्ति प्रेमाचे वैभव । नामघोषें मिरविती ॥४५॥
ऊन, पाऊस, अंधार । वादळ, वारा घनघोर । निराधारासी तई आधार । संतकृपा एकची ॥४६॥
तेच देती आनंदाचा । प्रकाश अंतरी नित्याचा । राधे गोविंद प्रेमाचा । गोड अति जिव्हाळा ॥४७॥
वृत्ती वैष्णवांची सदैव । अद्वैताची एकमेव । न ठेविती भेदभाव । अधम अथवा उत्तम ॥४८॥
आम्रवृक्ष वा निवडुंग । राहती उभे एकसंघ । मही परी न मानी भेद । लेखी दोघां समसमा ॥४९॥
ज्वालामुखी वा सुवर्ण मेरु । पृथ्वी दोघां आधारु । गाई व्याघ्राची तृषा हरु । सारखीच म्हणते सरिता ॥५०॥
म्हणोनि संताचें अंत:करण । सर्व भूतमात्रासी राहे समान । आनंदाची दीप्ती क्षणोक्षण । वैष्णव देती चैतन्याची ॥५१॥
वैष्णव चैतन्याचे सागर । ज्ञानतरुंचे आगर । श्रीकृष्ण प्रेमाचे निर्झर । सुख शांति पाझरती ॥५२॥
भक्ती-गंगेच्या डोहांत । बुडी घेतील जे भक्त । ते अमर होतील निश्चित । सत्य म्हणती वैष्णव ॥५३॥
ते तत्वदर्शी निरतिशय । सकलां करिती प्रकाशमय । भक्ति, प्रेम तयांचे निरामय । उभे करी ब्रह्म विटेवरी ॥५४॥
“दो वरी दोनी । भुजा आलो घेवोनी । आलिंगावया लागुनी । तयांचें अंग ॥”
ऐसे म्हणती भगवंत । जरी मज दोन हात । आलिंगवाया मम भक्त । चतुर्भुज जाहलो ॥५५॥
संपूर्णत्वानें भक्तां पाहावें । चारी हस्ते आलिंगावे । वैकुंठ सोडून नित्य यावें । हीच लालसा प्रभु म्हणती ॥५६॥
जनाबाईच्या झोपडींत । प्रभू होती प्रविष्ट । दळुकांडु लाविती हात । कैसे देव सुखावले ॥५७॥
भक्ताचे करी काज । पुरवोनी तयाचे चोज । सोडी सकलांची लाज । भक्तासाठीं श्रीहरी ॥५८॥
पूर आला पंढरीसी । पाणी चढले पायरीशी । तव धावले हॄषिकेशी । मदतीस जनाईच्या ॥५९॥
पाऊस पडे मुसळधारा । सुसाट घोघो वाहेवारा । नामयाच्या चंद्रमौळीघरा । सावराया आले परब्रह्म ॥६०॥
जिच्या चित्तांत लावण्यसुंदर । वासकरी मुरली मनोहर । ती कान्होपात्रा निरंतर । ध्यास धरी विठठलाचा ॥६१॥
कांतिसंपन्न कान्होपात्रा । बळजबरी ओढूं नेतां । ‘धावां पांडुरंगा’ मोकलिता । स्वहृदयीं प्रभु ठाव देती ॥६२॥
एकनाथाचे रांजण । घागरी स्कंधीं वाहून । भरिती स्वये प्रेमपूर्ण । द्वारकाधीश आजही ॥६३॥
“लाडके लडिवाळ नामा माझें तान्हें । तयाला मजविणें कोण आहे ॥”
ऐसी प्रीति भगवंताची । नामदेवा लाभली भाग्याची नागनाथाच्या देवळाची । कीर्तनी दिशा फिरविली ॥६४॥
नाम संकीर्तनाचा गजर । ऐकून पितांबरधारी श्रीधर । अंबरांतूनी भूवर । उतरोनी नाचतो कीर्तनीं ॥६५॥
दिंडयापताका घेऊनी हातीं । हर्षे वैष्णव तई म्हणती । अगाधि देवा श्रीपती । धन्य धन्य जाहलो ॥६६॥
अंतरीची दिव्य आस । पाहावे तुजसी सन्मुख । लोचनीं दिसावे सुस्वरूप । अखंड तुझे माधवा ॥६७॥
“नाम आठविता सद्गदकंठी । प्रेम वाढो पोटी ऐसे करी ।
रोमांच जीवन आनंदाश्रु येती । गात्री प्रेम तुझें”॥तुकाराम॥
प्रभु भेटीची अपूर्व आस । पूर्णेंदु जैसा चातकास । जीवन वाटे तय़ास । तीच व्याकुळता संताची ॥६८॥
भक्ति-प्रेमाचे दर्शन । घडेल ऐसे अनन्य । संस्कृती नीति धर्मसंपन्न । भूमीत केवळ भारताच्या ॥६९॥
पाश्चात्य तत्वज्ञ यासाठीं । भारतीं घ्यावा जन्म म्हणती । वैदिक धर्माची हिच महती ।
दुसरी याविण कुठली असे ॥७०॥
असेल लक्ष्मी अमेरिकेत । वा भौतिक वैभव पश्चमेंत । परी जगन्नियंता लक्ष्मीकांत । यमुने कांठीच दिसेल ॥७१॥
चंद्रभागेच्या तीरावर । हात ठेऊनी कटीवर । उभा राहिला प्रभुवर । युगे युगे याच देशीं ॥७२॥
सदाचार धर्माचार । हाच अभ्युदयाचा आधार । तेणेंच शुध्द बिजांकुर । फोफावतो स्वभावत: ॥७३॥
याच कारणें ही धर्मभूमी । साधुसंताची पुण्यभूमी । प्रज्ञावंताची कर्मभूमी । त्रिखंडात मान्यवर ॥७४॥
संत सकळ विश्वाचे । निखळ सूर्य प्रकाशाचे । तापत्रयांच्या तिमिराचें । नाश करिती तात्काळ ॥७५॥
हे दीपस्तंभ मार्गदर्शक । अंगीच्या शक्तीनें अद्भुत । मांगल्याचा देती प्रकाश । जगदोध्दारा कारणें ॥७६॥
संत स्त्रवती अमृतवाणी । प्राशितां ती सुखें श्रवणीं । पतित उध्दरती तत्क्षणी । शांति सुखासी पावती ॥७७॥
पेठा नामसंकीर्तनाच्या । संतानी बसविल्या सुखाच्या । ध्वजा-पताका धर्म भक्तीच्या । रोविल्या आनंदे ठायीं ठायीं॥७८।
प्रभुचे अखंड चिंतन । हेच एक अनुसंधान । नामस्मरण संकीर्तन । विष्णवांचे वैभव ॥७९॥
“कृष्ण विष्णु हरी गोविंद । या नामाचे निखळ प्रबंध ।
माजी आत्मचर्चा विशद । उदंड गाती” ॥ज्ञानेश्वरी॥
म्हणती प्रभो प्रेमाचा । अखंड वर्षाव सुखाचा । व्हावा तुझ्या कृपेचा । हृदय संपुटी आमुच्या ॥८०॥
तूच आमुचा आधार । येतां प्रसंग खडतर । तुजविणें कोण सांभाळणार । दयाघना आम्हांसी ॥८१॥
केवळ तुझे चिंतन । इतुकेच आम्ही जाणोन । करितो नित्य स्तवन । प्रेम कृपा असावी ॥८२॥
यासाठीं अनुदारपणा । नका ठेऊं नारायणा । येऊ द्या भक्ताची करुणा । प्रार्थना सदैव वैष्णवांची ॥८३॥
सांवळे सुंदर मनोहर । रूप तुझे हरीहर । राहावें हृदयीं निरंतर । लक्ष्मीपते नारायणा ॥८४॥
प्रभु तुम्ही वैकुंठीचे । आम्ही भक्त देहगांवचे । परी दर्शन आपुल्या चरणाचे । चुको न द्यावे कधीहि ॥८५॥
शक्ति, भक्ति लक्ष्मीसवे । भूतळी तुम्हीं नित्य यावे । सुख ऐश्वर्य प्राप्त व्हावे । जो जो वांच्छिल तयास ॥८६॥
माता प्रीतीचा कळवळा । काय विसरे आपुल्या बाळा । तेवीच तूं घननिळा । प्रेम देई आम्हांसी ॥८७॥
तुझी पडता कृपा दिठी । मारू चरणारविंदी मिठी । ठाव तुझा जगजेठी ।     सोडू न कधीं कल्पांती ॥८८॥
हे माझी मिराशी । ठाव तुझे पायांपाशी । हाच अभिमान उराशी । जतन करीन दयाघना ॥८९॥
वैष्णवांची ही वाणी । अमृतमय बोलणी । वैभवाची सुरम्य लेणी । अंतरीं असु द्या श्रोतेजन ॥९०॥
भक्तियोग आणि अध्यात्म । दोन्ही जरी अभिन्न । मार्ग तयाचे भिन्न भिन्न । ते परिसा म्हणती केशव ॥९१॥
करितां निर्गुण उपासना । सर्वोत्तम योगाची साधना । ही ज्ञानवंताची धारणा । गीतेंतहि विशद ॥९२॥
करणें सगुण उपासना । मार्ग सोपा सामान्य जनां । भक्तीयोगे येणे जाणा । साध्य होतो संत म्हणती ॥९३॥
सर्व जगतास कारण । सद्रुप आहे परब्रह्म । अनंततातहि एकच चैतन्य । शिकविती संत सुलभपणें ॥९४॥
जे पाहिले ते भगवद भूषण । ऐकीले ते भगवदनाम । सकल सृष्टि शुध्द चैतन्य । तेजाचाच तेजोनिधी ॥९५॥
विश्वांत सामावले चैतन्य । चैतन्यांत परब्रह्म । चैतन्य परब्रह्म एकसम । अविभक्त किंबहुना ॥९६॥
“तैसे विश्व येणें नांवे । हें मीचि पै आघवे । घेई चंद्रबिंब सोलावे । न लगे जेंवि” ॥ज्ञानेश्वरी॥
भगवंत सांगती या परी । अणुरेणुंत मीच जरी । राहिलो भरोनी सरोभरी । परि भक्तासी होतो सगुण ॥९७॥
ज्ञानयोगी ज्ञानानें । जाणती मज सकल गुणे । इतरांसी मम दर्शनें । भक्ति मार्गेच होतील ॥९८॥
सांवळा होऊनी विठठल । शामसुंदर घननीळ । रूपें जैशी जो इच्छिल । ठाकेन उभा तैसाची ॥९९॥
सगुण भक्तीचा सुबोध । सोपा आणि तत्वशुध्द । केला तुम्हां मी विशद । मार्ग म्हणती केशव ॥१००॥
धर्म अर्थ काम मोक्ष । हा चतुर्विध पुरुषार्थ । ध्यानीं ठेवोनी यथार्थ । भक्तिमार्ग आचरावा ॥१॥
पाप ताप आर्त दैन्य । होईल तयांचे निरसन । घेतां संताचें दर्शन । त्रिवार सत्य जाणावे ॥२॥
जागृति देवात्मक शक्तीची । लाभेल भाविका नित्याची । तळमळ अपूर्णता चित्ताची । शमेल जातां शरण तया ॥३॥
आनंदाचे उत्कट भाव । स्वानंदाचे वसंत वैभव । पहाल श्रोते अभिनव । संतपदीं लीन होता ॥४॥
भगवत भाव सर्वांभूती । हेची ज्ञान हेची भक्ती । अनिर्वैध जे जाणती । वैष्णव तयास म्हणावें ॥५॥
स्वधर्माचा प्रकाश । विश्वांत असावा अशेष । सुख-शांतीचा हेमकलश । वर्षावा अमृत सकलावरी ॥६॥
उदय व्हावा सौभाग्याचा । संतकृपे सुभंगाचा । आशीर्वाद ऐसा सुखाचा । मागणें देवा तुजपाशीं ॥७॥
हीच प्रार्थना प्रभुचरणीं । केली केशव प्रभुनी । मग राधे गोविंद नाम घोषांनी । सांगता झाली प्रवचनाची ॥८॥
भक्तीभावे जे जे । गातील वैभव विष्णवांचे । तेहि त्या प्रभुचे । प्रिय होतील अनित्य ॥९॥
इति श्री यशोधन विरचित । श्रीसद्गुरु केशवदत्त चरित । भक्त भाविकां होवो सुखद । सातवा अध्याय संपूर्ण ॥११०॥
॥ इति सप्तमोऽध्याय समाप्त॥

N/A

References : N/A
Last Updated : December 02, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP