मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|

पांडवप्रताप - अध्याय ५३ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ जय जय क्षीराब्धिजाविहारा ॥ मत्स्यरुपिया वेदोद्धारा ॥ महाकपटिया शंखासुरा ॥ वधोनियां धर्म वाढविला ॥१॥
मंदरगिरी धरोनि पृष्ठावरी ॥ चतुर्दश रत्नें काढिलीं बाहेरी ॥ कूर्मवेषा मधुकैटभारी ॥ भक्तकैवारी तूं साच ॥२॥
रसातळा सृष्टी जातां ॥ सकल देवीं धांवा करितां ॥ वराहवेषें तूं रमानाथा ॥ पृथ्वी दाढे धरियेली ॥३॥
स्तंभ भेदोनियां एकसरा ॥ विदारिलें महाअसुरा ॥ प्रर्‍हादरक्षका सर्वेश्वरा ॥ नृहरिवेषधारका ॥४॥
जो दानें व्रतें तपें बळी ॥ त्यापाशीं याचक तूं वनमाळी ॥ त्रिभुवन तुवां आटिलें पायांतळीं ॥ वामनवेषें कमलेशा ॥५॥
सेवक स्यंदन पृतना नाहीं ॥ तीन सप्तकें निर्वीर मही ॥ करुनि सर्वदा तूं विजयी ॥ अद्यापि पाहीं नांदसी ॥६॥
वैश्रवणबंधु दशास्य ॥ तेणें बंदीं घातले त्रिदश ॥ मग त्वां धरोनि रामवेष ॥ अदितिपुत्रां सोडविलें ॥७॥
तोचि तूं आनकदुंदुभिसुत ॥ द्वारकाधीस मन्मथतात ॥ तांडव दाखवूनि अद्भुत ॥ पांडव रक्षिले निजबळें ॥८॥
कलियुगीं लोक धनान्ध ॥ जिंहीं जवळी रक्षिले कामक्रोध ॥ तयांसी तूं न बोलसी बौद्ध ॥ लीला अगाध दाविसी ॥९॥
पुढें म्लेच्छ माजतील दारुण ॥ टाकितील सत्कर्मधर्म मोडून ॥ मग तूं कल्कीवेष भगवान ॥ तुरंगवहनीं प्रकटसी ॥१०॥
तोचि तूं सर्वेशा भीमातीरीं ॥ दोन्ही कर ठेवूनि कटीवरी ॥ अद्यापि नांदसी पंढरीं ॥ ब्रह्मानंदा जगद्भुरु ॥११॥
मागें पर्व संपलें सौप्तिक ॥ पुढें लागलेंसे ऐषिक ॥ वैशंपायन वक्ता सुरेख ॥ जनमेजयाप्रति सांगे ॥१२॥
कृतवर्मा अश्वत्थामा शारद्वत ॥ हे निशीमाजी करुनि गेले आकांत ॥ जाहला दुर्योधनाचा देहान्त ॥ गतकथार्थ इतुका हा ॥१३॥
पांडवसेना मारिली समस्त ॥ धृष्टद्युम्नाचा सारथी उरला तेथ ॥ तो अट्टहास्यें गर्जना करीत ॥ गेला धांवत पांडवांपाशीं ॥१४॥
म्हणे उठा उठा रे सत्वर ॥ जळो तुमचा एकान्त विचार ॥ इकडे आकांत जाहला थोर ॥ कुल समग्र संहारिलें ॥१५॥
कृतवर्मा कृपाचार्य द्रोणसुत ॥ तिघांनी येऊनि केला घात ॥ पंचकुमार आणि सेनानाथ ॥ धृष्टद्युम्न मारिला ॥१६॥
शिखंडीआदि थोरलहान ॥ सेना टाकिली सर्व संहारुन ॥ सर्व शिबिरां लाविला अग्न ॥ चतुरंगदळ संहारिलें ॥१७॥
मी एकलाचि चुकलों मरणा ॥ धांवलों करीत येथें गर्जना ॥ उठा उठा भीमाजुनी ॥ सर्व वंश बुडाला ॥१८॥
ऐसें ऐकतां धर्म भूपाळ ॥ धबधबां पिटी वक्षःस्थळ ॥ मूर्च्छना येऊनि तत्काळ ॥ पडूनि उठे मागुती ॥१९॥
अट्टहासें रडे भीमसेन ॥ आक्रोशें हांक फोडी अर्जुन ॥ नकुल सहदेव दोघे जण ॥ कपाळ धरणीं आपटिती ॥२०॥
श्रीकृष्णसहित पंडुसुत ॥ शिबिराप्रति आले धांवत ॥ तों प्रेतें होऊनि समस्त ॥ पडिले आप्त पुत्र मित्र ॥२१॥
नकुल घेऊनियां रथ ॥ उपलव्यासी गेला धांवत ॥ द्रौपदी सुभद्रा स्त्रिया समस्त ॥ घेऊनि आला त्वरेनें ॥२२॥
द्रौपदीस कळों न देतां मात ॥ रथ पवनवेगें पिटीत ॥ पांचाळी सुभद्रा पुसत ॥ काय वृत्तान्त सांगा आम्हां ॥२३॥
येरु म्हणे चला सत्वर ॥ वर्तमान कळेल समग्र ॥ श्रीरंगभगिनी सुकुमार ॥ चिंतानळें आहाळली ॥२४॥
तों शिबिराजवळी आला रथ ॥ कानीं ऐकिला एकचि आकांत ॥ समाचार कळला समस्त ॥ कीं पुत्र बंधु पडियेले ॥२५॥
गडबडां लोळे याज्ञसेनी ॥ ललाट आपटी मेदिनीं ॥ मृत्तिका घेऊनि घाली वदनीं ॥ भीम दृढ तीतें ॥२६॥
वक्षःस्थल पिटोनि द्रुपदकुमारी ॥ म्हणे धर्मराया आतां राज्य करीं ॥ निर्वंश केली धरित्री ॥ करी एकछत्री राणीव ॥२७॥
प्रतिविंध्यादि पंचकुमार ॥ कोठें दाखवा माझा सौभद्र ॥ कोठें आहे तो घटोत्कच वीर ॥ पुत्र माझा दाखवा कां ॥२८॥
कोठें धृष्टद्युम्न पाठिराखा ॥ दावा माझिया द्रुपदजनका ॥ हें दुःखरुप राज्य देखा ॥ भोगा आतां जन्मवरी ॥२९॥
द्यावया आम्हां तिलांजली ॥ कोणी उरला नाहीं एक मुळीं ॥ काय पाहसी कृष्णा वनमाळी ॥ अंधार कुलीं पडियेला ॥३०॥
पांडवांचें हृदय पाहें ॥ मज गमे वज्राऐसें आहे ॥ अजुनी कां तुझ्या हृदया द्रव न ये ॥ पाहतोसी काय चहूंकडे ॥३१॥
सुभद्रा शोकें व्याकुळ ॥ म्हणे सात जण माझे बाळ ॥ त्यांत एक तरी निर्मळ ॥ वदन त्याचें पाहीन मी ॥३२॥
द्रौपदी म्हणे आपुला प्राण ॥ आतांचि मी येथें त्यागीन ॥ अथवा महाविष भक्षीन ॥ घालूनि घेईन गळां पाश ॥३३॥
निद्रित सांडूनि कुमार ॥ काय करावया गेलां विचार ॥ तुमचे विचारें समग्र ॥ कुलक्षय जाहला कीं ॥३४॥
समरांगणीं पडते बालक ॥ तरी मज इतुका न वाटता शोक ॥ शिबिरांत कोंडूनि देख ॥ कैसे निद्रित मारिले ॥३५॥
धुंडाळितां हें त्रिभुवन ॥ अभिमन्यूऐसें नाहीं रत्न ॥ उत्तरेचें वदन ॥ कुंकुमहीन केवीं पाहूं ॥३६॥
तो अश्वत्थामा चांडाळ ॥ बाळहत्यारी परम खळ ॥ त्याचें शिर छेदूनि तत्काळ ॥ उठा आणा आतांचि ॥३७॥
नाहीं तरी जीवाशा सोडून ॥ येथेंचि आम्ही देऊं प्राण ॥ ऐसें ऐकतां भीमसेन ॥ क्रोधेंकरुन उठिला पैं ॥३८॥
भीम बैसला रथीं ॥ नकुल जाहला सारथी ॥ मग बोले कमलापती ॥ पार्थाप्रति तेधवां ॥३९॥
ब्रह्मशिरोस्त्र दारुण ॥ अश्वत्थामा देईल टाकून ॥ तेव्हां कैंचा उरेल भीमसेन ॥ भस्म होईल क्षणार्धे ॥४०॥
तरी अर्जुना धांव सत्वर ॥ बैसावया नाहीं रहंवर ॥ मग श्रीकृष्णरथीं सुभद्रावर ॥ धर्मराजही बैसला ॥४१॥
धुरेवरी बैसला इंदिरावर ॥ भीमासी आटोपीत सत्वर ॥ परी धांवता नाटोपे वृकोदर ॥ पवनवेगें धांवतसे ॥४२॥
तों जान्हवीचे तीरीं ॥ व्यासदेव देखिले ते अवसरी ॥ ऋषींची मांदी निर्धारीं ॥ भोंवती तेव्हां विराजे ॥४३॥
व्यासाचे पाठीं लपोन ॥ बैसलासे द्रोणनंदन ॥ भीमासी दुरुनि देखोन ॥ भयभीत जाहला ॥४४॥
पाहोनि भीमाचा आवेश ॥ वाटे येतो काळपुरुष ॥ भीमें हांक फोडिली विशेष ॥ तेणें ब्रह्मांड गाजविलें ॥४५॥
मग क्रोधायमान गुरुपुत्र ॥ काढिलें निर्वाणींचे अस्त्र ॥ ज्याचें निवारण हरिहर ॥ विधि पुरंदर करुं न शकती ॥४६॥
तें अस्त्र द्रोणें पुत्रासी दिधलें ॥ जरी बहु प्राणसंकट पडलें ॥ ते वेळे हें सोडीं वहिलें ॥ कार्य चिंतिले करणार ॥४७॥
तें अस्त्र द्रौणी जपोन ॥ ध्यान मंत्र न्यास करुन ॥ मग दर्भशिखा घेऊन ॥ संकल्प करुन सोडीत ॥४८॥
म्हणे हें महाप्रलयास्त्र ॥ येणें संहारोत पांडव समग्र ॥ त्यांचे स्त्रियांचे पोटीं असेल साचार ॥ गर्भ जरी कोणीही ॥४९॥
गर्भांत जरी पुरुष ॥ तोही या अस्त्रें पावेल नाश ॥ मग तो दर्भ सोडितां निःशेष ॥ चपलेऐसा चालिला ॥५०॥
श्रीरंग म्हणे अर्जुनासी ॥ त्वरा करीं काय पाहसी ॥ तुम्हां पांचांसही ग्रासी ॥ ऐसें अस्त्र येतसे ॥५१॥
ब्रह्मशिरोनाम अस्त्र ॥ तूंही सोडीं सत्वर ॥ तेणें चापासी लावूनि शर ॥ त्याचि प्रकारें सोडिलें ॥५२॥
प्रलय करीत जात ते क्षणीं ॥ दोन्ही अस्त्रें मिळालीं गगनीं ॥ त्या तेजावतीं शशि तरणी ॥ बुचकळ्या देऊं लागले ॥५३॥
प्रलयींच्या विजा सहस्त्र ॥ एकदांचि कडकडल्या साचार ॥ तैसीं मिळालीं एकत्र ॥ प्रलय थोर वर्तला ॥५४॥
ब्रह्मांड तडाडलें ते कालीं ॥ नवखंडें कंपित जाहलीं ॥ समुद्राचीं उदकें तापलीं ॥ उकडों लागलीं जलचरें ॥५५॥
सप्त पातालें हडबडती ॥ भोगींद्र सोडूं पाहे क्षिती ॥ मेरु मंदार आंदोलती ॥ मुनी भाविती अंत आला ॥५६॥
व्यासदेव बोले ते समयीं ॥ अस्त्रें आवरा रे दोघेही ॥ हीं मनुष्यांवरी सहसाही ॥ सोडूं नका सर्वथा ॥५७॥
पार्थ म्हणे स्वामी समर्था ॥ तुझी आज्ञा माझिया माथां ॥ महा अस्त्र क्षण न लागतां ॥ आवरोनि आच्छादिलें ॥५८॥
परी द्रोणपुत्रासी जाणा ॥ ब्रह्मास्त्र कदा आवरेना ॥ उपाय केले जरी नाना ॥ आटोपेना कदाही ॥५९॥
द्रौणी म्हणे भीमभयेंकरुनी ॥ म्यां क्रोधें सोडिलें संकल्पूनी ॥ परी हें आतां कदा माझेनी ॥ सहसाही आटोपेना ॥६०॥
म्यां पापें बहुत केलीं जाणा ॥ हें अस्त्र मज आटोपेना ॥ आटोपेल एका अर्जुना ॥ पुण्यवंत म्हणोनियां ॥६१॥
तरी माझे अस्त्र अनिवार ॥ गर्भींचे आदिकरुनि समग्र ॥ उरों नेदी पांडव साचार ॥ हा निर्धार चुकेना ॥६२॥
मग बोले गोविंद ॥ उत्तरेसी दिधला विप्रांनी आशीर्वाद ॥ युद्धांती दिव्य पुत्र प्रसिद्ध ॥ परीक्षिति नामें होईल ॥६३॥
द्रौणी म्हणे माझें अस्त्र ॥ उपलव्यासी जाईल सत्वर ॥ न लागतांही क्षणमात्र ॥ गर्भ छेदील उत्तरेचा ॥६४॥
मग बोले चक्रपाणी ॥ तूं बालहत्यारा पापखाणी ॥ तीन सहस्त्र वर्षे घोरवनीं ॥ पिशाच होऊनि विचरें पैं ॥६५॥
तुज भरेल गलितकुष्ठ ॥ पूय शोणित वाहेल यथेष्ट ॥ तूं होसील कर्मभ्रष्ट ॥ एक ठाव न मिळे तूतें ॥६६॥
कोणी सत्पुरुष ब्राह्मण ॥ त्याचें तुज न होय दर्शन ॥ जैसें दीपाचे पोटीं काजळ कुलक्षण ॥ द्रोणाउदरीं तैसा तूं ॥६७॥
पांडवांसी मी आहें रक्षक ॥ तूं त्यांसी काय करिसी मशक ॥ घुंगुरडें कोपलें जरी निष्टंक ॥ तरी पर्वत केवीं त्या गिळवे ॥६८॥
आतां छेदीन म्हणसी उत्तरेचा गर्भ ॥ तरी रक्षीन त्यासी मी पद्मनाभ ॥ गोकुळ रक्षिलें स्वयंभ ॥ प्रलयशिला वर्षतां ॥६९॥
द्वादश गांवें लागला अग्न ॥ म्यां गिळूनि रक्षिले गोकुळजन ॥ प्रर्‍हाद गांजितां दारुण ॥ म्यांचिरक्षिला नानापरी ॥७०॥
तो परीक्षिती रक्षीन नानापरी ॥ तरीच मी भक्तसाहाकारी ॥ साठ सहस्त्र वर्षे निर्धारीं ॥ राज्य करील पुण्यपुरुष तो ॥७१॥
कृपाचार्यापासोन ॥ पावेल विद्या संपूर्ण ॥ उपजला नसतां जाण ॥ भविष्य केलें जाण हें ॥७२॥
व्यास नारद श्रीकृष्ण ॥ म्हणती मणि दे मस्तकींचा उतरुन ॥ अर्जुनासी येईं शरण ॥ वांचवी प्राण आपुला ॥७३॥
मग बोले गुरुनंदन ॥ तरी तो मणि माझा केवळ प्राण ॥ सर्वरक्षक बहुत गुण ॥ न वर्णवती तयाचे ॥७४॥
मणि माथांचा देतां जाण ॥ माझा शिरश्छेद केला पूर्ण ॥ मग अर्जुनासी जयकल्याण ॥ सहजचि प्राप्त जाहलें ॥७५॥
मग पार्थे बाण सोडून ॥ मणि मस्तकींचा घेतला छेदून ॥ स्यमंतकमणिसमान ॥ कीं कौस्तुभ दुसरा पैं ॥७६॥
पिशाच होऊनि गुरुसुत ॥ गेला उत्तरदिशेप्रति रडत ॥ ब्रह्मराक्षस होऊनि हिंडत ॥ श्रीकृष्णशापें करुनियां ॥७७॥
सर्वांगी कुष्ठ गलित ॥ दुर्गंधि सुटली अरण्यांत ॥ मणि छेदिला तेथूनि स्त्रवत ॥ पूयशोणित सर्वदा ॥७८॥
न होत सत्पुरुषांचें कदा दर्शन ॥ न मिळे राहावया एक स्थान ॥ असो इकडे पंडुनंदन ॥ विजयी होऊन परतले ॥७९॥
तो दिव्य मणि घेऊनी ॥ देते जाहले याज्ञसेनी ॥ पांचही जण मिळोनी ॥ तिवें करिती समाधान ॥८०॥
धनंजय म्हणे हो द्रौपदी ॥ अश्वत्थाम्यासी मारितों युद्धीं ॥ परी तो कदाकाळीं कुबुद्धी ॥ चाप हातीं धरीना ॥८१॥
लपाला व्यासाचे पाठीसी ॥ उभा न राहे युद्धासी ॥ मग मणि घेऊनि त्यासी ॥ रमानायकें शापिलें ॥८२॥
यावरी तो द्रौपदीनें मणी ॥ दिधला धर्मरायालागूनी ॥ मुकुटीं बांधिला तेचि क्षणीं ॥ जैसा गगनीं चंद्रमा ॥८३॥
धर्म म्हणे जी चक्रपाणी ॥ त्र्यंबकासी बळी देऊनी ॥ रुद्र स्थापी पाकशासनी ॥ आवाहनूनि मूर्तिमंत ॥८४॥
तें रक्षण असतां महद्भूत ॥ कैसा प्रवेशला गुरुसुत ॥ हरि म्हणे युद्ध बहुत ॥ तेणें केलें शिवाशीं ॥८५॥
करुनि स्तवन हवन ॥ पूर्णाहुतीचे समयीं जाण ॥ आपुलें देतां बलिदान ॥ शिव प्रसन्न जाहला ॥८६॥
शिवें तया खङ्ग दिधलें अद्भुत ॥ मग तें घेऊनि गुरुसुत ॥ निजले संहारी समस्त ॥ दुष्ट कुबुद्धि दुरात्मा ॥८७॥
द्रौपदीचें समाधान ॥ करिती बहु कृष्णार्जुन ॥ म्हणती अश्वत्थामा गुरुनंदन ॥ आणि ब्राह्मण त्यावरी ॥८८॥
आणि होय चिरंजीव ॥ त्यासी मारुं न शके वासव ॥ जगद्बुरु व्यासदेव ॥ तेणें पाठीशीं घातला ॥८९॥
हातीं न धरी धनुष्यबाण ॥ दिधलें ब्रह्मशिरोस्त्र सोडून ॥ मग मस्तकींचा मणि प्रभाघन ॥ घेतला छेदून बळेंचि ॥९०॥
शिरच्छेदाहूनि आगळें जाण ॥ दुःख जाहलें त्यासे द्विगुण ॥ मणि काढिला तेथून ॥ पूय रक्त स्त्रवे सदा ॥९१॥
तरी मणि आम्हीं घेतला बळें ॥ तेव्हांचि त्याचें शिर छेदिलें ॥ ऐसें ॥ बोलोनि ते वेळे ॥ बुझाविलें पांचाळासी ॥९२॥
ज्ञानीं पाहे शतपत्रनेत्र ॥ तों गुरुपुत्रें सोडिलें अस्त्र ॥ उत्तरेचा गर्भ पवित्र ॥ छेदावया धाडिलें ॥९३॥
उपलव्याहूनि उत्तरादेवी ॥ आणिली होती तेथें पूर्वीं ॥ परी अस्त्र शोधीत उर्वी ॥ तियेजवळी पातलें ॥९४॥
तंव तो जगव्द्यापक परमपुरुष ॥ जाणे मुंगीचेंही मानस ॥ लीलाविग्रही आदिसर्वेश ॥ तिचे गर्भीं प्रवेशला ॥९५॥
अंगुष्ठमात्र पुरुष होऊन ॥ शंख चक्र गदा हातीं घेऊन ॥ किरीटकुंडलीं मंडित जाण ॥ धरिलें स्वरुप तेणेंचि ॥९६॥
उत्तरेचे गर्भांत प्रवेशून ॥ हातीं घेऊनि सुदर्शन ॥ घिरटी घाली भगवान ॥ मनमोहन रुप ज्याचें ॥९७॥
तंव तो गर्भ पुण्यवंत ॥ अभिमन्यूचें दिव्यरेत ॥ आठवा मास तीस प्राप्त ॥ आनंदभरित उत्तरा ॥९८॥
गर्भांतील पुरुष परम ज्ञानिया ॥ म्हणे मज अस्त्र आलें मारावया ॥ परी येथें हा कोण रक्षावया ॥ मजकारणें पातलासे ॥९९॥
जिकडे फिरे भगवंत ॥ तिकडे गर्भ पाहे परीक्षीत ॥ अस्त्रभय विसरला समस्त ॥ न्याहाळीत परमपुरुषा ॥१००॥
गदा हातीं घेऊन ॥ अस्त्रावरी धांवे भगवान ॥ एवं अस्त्र निष्फळ करुन ॥ टाकिलें वितळून श्रीहरीनें ॥१०१॥
सवेंचि भगवान जाहला गुप्त ॥ गर्भ चहूंकडे न्याहाळीत ॥ म्हणे मज जो होता रक्षीत ॥ तो कोणीकडे पैं गेला ॥१०२॥
मग उत्तरा जाहली प्रसूत ॥ बालसूर्याऐसा उपजला सुत ॥ परी बाळ परीक्षा करीत ॥ वदनें न्याहाळीत सर्वांचीं ॥१०३॥
जो कोणी दृष्टी पडे ॥ न्याहाळूनि पाहे तयाकडे ॥ म्हणे माझें वारिलें सांकडें ॥ कोणीकडे आहे तो ॥१०४॥
भोंवता रक्षिला निश्चित ॥ नाम ठेविलें परीक्षित ॥ जो आजानुबाहु दीप्तिमंत ॥ अभिमन्यु दुसरा पैं ॥१०५॥
ज्याचे जन्मकाळीं सोहळा ॥ धर्मराजें बहुत केला ॥ वसुधामर ते वेळां ॥ सुखी केले सर्व दानीं ॥१०६॥
द्रौपदी सुभद्रा येऊन ॥ बाळ पाहती आनंदघन ॥ तों बाळासी नाहीं दुसरें ध्यान ॥ पाहे न्याहाळून सर्वांकडे ॥१०७॥
आल्यागेल्यासी परीक्षीत ॥ जडला हरिरुपी सदा हेत ॥ पांडव आश्चर्य करीत ॥ हृद्भत काय याचें ॥१०८॥
सर्वांची हा परीक्षा करीत ॥ नेणवे कोणासी आहे धुंडीत ॥ असो हा पुढील कथार्थ ॥ समयोचित कथियेला ॥१०९॥
सिंहावलोकनेंकरुन ॥ परिसा मागील कथानुसंधान ॥ धृतराष्ट्र गांधारी जाण ॥ शोकार्णवी पहुडलीं ॥११०॥
तेथें नानाप्रकारेंकरुन ॥ संजय करील समाधान ॥ ऐषिकपर्व येथून ॥ एकाचि अध्यायीं संपलें ॥१११॥
पुढें विशोकपर्व सुरस पूर्ण ॥ श्रवण करोत पंडितजन ॥ जें जें बोलिला वैशंपायन ॥ तेंचि येथें कथियेलें ॥११२॥
दंतकथा सांडोनि सकला ॥ व्यासभारत आश्रय धरिला ॥ प्रमाण प्रणवकथा निर्मळा ॥ निरुपिल्या त्याचि येथें ॥११३॥
त्यांतील कथा नाहीं सोडिली ॥ दंतकथा नाहीं दुसरी योजिली ॥ प्राकृतकवींची कांस धरिली ॥ नाहीं सहसा पांडुरंगें ॥११४॥
तो क्षणक्षणां येऊन ॥ जागें करी थापटून ॥ म्हणे श्रीधरा ऊठ करीं लेखन ॥ कर्णीं तुज सांगतों मी ॥११५॥
कैसी घेतली माझी पाठी ॥ आठवूं नेदी दुसरी गोष्टी ॥ उभा ठाकोनि म्हणे उठीं ॥ व्यासभारत लिहीं हें ॥११६॥
सकल पाल्हाळ टाकूनी ॥ सारांश अर्थ सांगतो कानीं ॥ तोचि तूं पत्रीं लिहोनी ॥ ठेवितां मज आवडे ॥११७॥
हा वरद ग्रंथ जाण ॥ करील बहुतांसी पुढें पावन ॥ आबाल परम अज्ञान ॥ येणेंचिकरोन तरतील ॥११८॥
आदिपर्वापासोनि जाणावें ॥ ऐषिकपर्व हें बारावें ॥ पंढरीनाथें दयार्णवें ॥ अति अपूर्व कथियेलें ॥११९॥
श्रीधरवरदा दीनोद्धारा ॥ ब्रह्मानंदा परमोदारा ॥ भीमातटविहारा दिगंबरा ॥ अभंग भजन देईं तुझें ॥१२०॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ ऐषिकपर्व व्यासभारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ त्रेपन्नाव्यांत कथियेला ॥१२१॥
इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे परीक्षितजन्मकथनं नाम त्रिपंचाशत्तमाध्यायः ॥५३॥
॥ श्रीकृष्णर्पणमस्तु ॥ इति ऐषिकपर्व समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP