मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|

श्यामची आई - रात्र तेरावी

’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


‘ जो गृहस्थ असतो त्याने दक्षिणा घ्यावयाची नसते . दक्षिणा भिक्षुक ब्राह्यणाला घेण्याचा अधिकार . कारण त्याला इतर उत्पन्न नसते व वेदविद्योशिवाय इतर धंदा नसतो . म्हणून ब्राह्यणाला दक्षिणा द्यावी . असे सांगितले आहे . इतर देशांतही उपाध्याय आहेत ; इतर धर्मांतही ते आहेत . काही ठिकाणी त्यांना सरकारतूनच पगार मिळतो ; आपल्याकडे समाजच ब्राह्यणाला देई ." श्यामने आरंभ केला .

‘ आमच्या गावात एकदा एके ठिकाणी लग्न होते . शेवंतीवाङनिश्र्चय जेव्हा करितात , तेव्हा उभय मंडपात -- वधूवर मंडपात -- दक्षिणा वांटतात . आपल्या ऐपतीप्रमाणे ही दक्षिणा देतात . वधूघरचा एक उपाध्याय व वराघरचा एक उपाध्याय असे दोघे बरोबर दक्षिणा देत मंडपात हिंडतात . जितकी वराकडची तितकीच वधूकडची . वराकड्यांनी चार चार आणे दिले , तर वधूपक्षही चार चार आणे देतो . जो हात पुढे करील , त्याला दक्षिणा देण्यात येत असते . लग्नाला जेव्हा मंडळी जाते , तेव्हा मुले आपापल्या वडील मंडळींजवळच बसलेली असली , तर हे शिक्षण आपोआपच त्यांना मिळते . ‘ अरे , आपण नाही हो हात पुढे करावयाचा ’ वगैरे ते मुलांना सांगतात .

परंतु अलीकडे स्वाभिमानच उरला नाही . पैशासाठी आपण हपापलेले आहोत . फुकट मिळेल , तेवढे घ्यावे . अशी वृत्ती झाली आहे . आगगाडीतून जपानी एजंट सिगारेट वगैरे फुकट वाटतात व श्रीमंतही त्या फुकट सिगारेट घेऊन ओढताना मी पाहिलेले आहेत . श्रीमंतसुध्दा मोफत दवाखान्यात जाऊन औषध घेतील . श्रीमंतांची मुलेसुध्दा नादारीसाठी अर्ज करतील . दारिद्य्राचा व दास्याचा हा परिणाम आहे .

मी लग्नाला व मुलांमध्ये जाऊन बसलो . शाळेतील बरोबरची आम्ही मुले एकत्र बसलो होतो . एका बाजूने बसले , म्हणून खोड्या करता येतात , टवाळकी करता येते . कोणाच्या टोंपीवर नारळाची शेंडी ठेवा , कोणाच्या खिशात खडे टाक , कोणाला हळूच चिमटा घे , असे चालते . दक्षिणा वाटण्यात आली . काही मुलांनी हात पुढे केले . मीही माझा हात पुढे केला . सहज गोष्ट होऊन गेली . माझ्या लक्षात चूक आली नाही लहानपणी पैसे हातात असले म्हणजे आनंद होतो . मी ते दोन आणे घेऊन घरी आलो व मोठ्या हर्षाने आईजवळ द्यावयास गेलो . जणू माझ्या कमाईचे , माझ्या श्रमाचेच ते होते ! भटजी बाराबारा वर्षे मंत्र शिकतात , ते विधी करितात , तर त्यांना घेऊ दे . मला ते दोन आणे घेण्याचा काय अधिकार ? प्रत्येकाने श्रमावे व मोबदला घ्यावा , तरच ते शोभून दिसते .

एकदम ओशाळली . तिचे तोंड म्लान झाले . आम्ही गरीब झालो होतो . आपण गरीब , म्हणून मुलाने दक्षिणा आणली का ? का आपण गरीब झालो , म्हणून कीव येऊन भिक्षुकाने आपल्या मुलाच्या हातावर पैसे ठेवले ? कारण एखाद्या घरंदाज घराण्यातील मुलाने हात पुढे केला , तर भिक्षुक आपण होऊनच त्या मुलाला म्हणे , ‘ वेड्या ! तू का हात पुढे करावयाची ? तू डोंगर्‍यांकडचा ना ? माझ्या मुलाला भिक्षुक असे का म्हणाले नाहीत ? त्यांना आमची कीव आली . जगात दुसर्‍याने आपली कीव करावी , याहून करूणास्पद व दु : खप्रद दुसरी कोणती गोष्ट आहे ? आईच्या मनात असे शेकडो विचार त्या वेळी आले . ती बोलेना . शून्य दृष्टीने पाहत राहिली .

" आई , घे ना ग पैसे . मी काही चोरून नाही हो आणले ,’ मी काकुळतीस येऊन म्हटले . आई म्हणाली , " श्याम ! आपण गरीब असलो , तरी गृहस्थ आहोत . आपण भिक्षुक नाही . भिक्षुकीचा धंदा आपला नाही . आपण दक्षिणा घ्यायची नसते , ते आपले काम नाही . आपण दुसर्‍याला द्यावी . भटजी वेद शिकतात , धार्मिक कामे करतात , त्यांना शेतभात नसते , ही दक्षिणा हेच त्यांचे उत्पन्न ."

मी म्हटले , " आपल्या गावातील ते पांडूभटजी किती श्रीमंत आहेत ! त्यांनी तरी दक्षिणा घ्यावी का ? सावकारी करतात ; शेतीभाती आहे . हे असले कसले भटजी ?"

आई म्हणाली , " तो त्यांचा दोष . पूर्वी भटजींनी दक्षिणा जास्त मिळाली , तर ते गोरगरिबांना देऊन टाकीत : घरी मुले शिकावयास ठेवीत . त्या पांडवप्रतापात नाही का , की नळराजाने ब्राह्यणास खूप धन दिले . ते धन ब्राह्यणांनी वाटेतच दुसर्‍यांना वाटून दिले . ऋषींच्या घरी किती तरी मुले शिकावयास राहत असत . आपण गृहस्थ . आपण दक्षिणा घेऊ नये . तू पुन्हा हात पुढे करू नकोस . रोहिदास पाणपोई चेही पाणी प्यायला नाही . गृहस्थाने जगास द्यावे . जगापासून घेऊ नये .’

आईने ते दोन आणे शेजारी बाळू म्हणून गडी होता त्याला देऊन टाकले . मित्रांनो ! जगापासून जितके आम्ही घेऊ , तितके जगाचे आपण मिधे होत असतो . आपण दीनवाणे होत असतो . दुसर्‍यांच्या तोंडाकडे पाहणारे होत असतो . दीनवाणे जगणे हे पापच आहे . ताठरपणे , उन्मतपणे जगणे हेही पापच . जगाचे मिधे होणे नको . युरोपमध्ये ही स्वाभिमानी वृत्ती लहानपणापासूनच शिकविण्यात येत असते . आईबापांच्याही पैशावर जगणे हा तेथे मिधेपणा व कमीपणा मानतात . अमेरिकेचे प्रेसिडेंट हूव्हर यांची गोष्ट सांगतात . त्यांनी आपल्या तेरा वर्षे वयाच्या मुलास मजुरीने काम करावयास पाठविले . धनाढ्य अशा अमेरिकेचे मुख्य अध्यक्ष हूव्हर होते ; परंतु त्याच वेळेस त्यांचा हा लहान मुलगा एका गवंड्याच्या हातांखाली काम करीत होता . एका इमारतीचे बांधकाम चालले होते . ते चालले असता काम करताना हा मुलगा उंचावरुन पडून मेला . हूव्हरसाहेबास वाईट वाटले ; परंतु ते म्हणाले , " माझ्या राष्ट्राला स्वावलंबन व श्रमाची महती शिकविण्यासाठी माझा मुलगा मेला !"

स्वावलंबन हा पाश्र्चिमात्य शिक्षणाचा पाया आहे . स्वावलंबनाने मान वर राहते . परावलंबनाने मान खाली होते . श्रमाशिवाय काही घेऊ नये व कोणी श्रम केल्याशिवाय त्याला देऊ नये . " तुका म्हणे घेतो देतो तोही नरका जातो !" आळशी मनुष्याला पोसणाराही पापी आणि आळशीही पापी . कोणा आळशाला जेव्हा आपण देतो तेव्हा तो मिधा , दीनवाणा असतो व आपण ऐटीत असतो . याच्या उलट त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यावे , लाकडे फोडून घ्या , कपडे धुऊन घ्या , जमीन खणून घ्या , काहीतरी काम करून घ्या . त्यात खरोखरच त्या माणसाचा उध्दार आहे . स्वावलंबन , स्वाभिमान , श्रम ह्यांची महती आज रशियात शिकविण्यात येत आहे . नुकताच एक अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रशियात गेला होता . रशियातील परिस्थिती , तेथील अंतर्बाह्य परिवर्तन पाहावयास तो गेला होता . मजुरांना वाटण्यासाठी म्हणून त्याने झरण्या ( फाऊंटन पेने ) चाकोलेटच्या वड्या , सुंदर चाकू वगैरे वस्तू घेतल्या होत्या . मजुरांच्या चाळीत जाऊन तो त्यांना त्या बक्षीस म्हणून देऊ लागला . परंतु एकही हात पुढे झाला नाही . कोणीही वस्तू घेतली नाही . तो म्हणाला , ‘ घ्या , मी प्रेमाने देत आहे .’ ते मजूर म्हणाले , ‘ स्वत : च्या श्रमाने मिळवावे . दुसर्‍याने दिलेली देणगीही घेऊन कदाचित मनात आलस्य , मिधेपणा व परावलंबन यांचा उदय व्हावयाचा . या दुर्गुणांनी यत्किंचितही वाव न देण्याचे आम्ही ठरविले आहे . "

तो अमेरिकन मानसशास्त्रज्ञ चकित झाला . केवढी ही विचारक्रांती ! ज्या रशियात लाखो मजूर मागण्यासाठी पूर्वी हात पुढे करीत , तेथे एकही हात पुढे झाली नाही . स्वावलंबन , केवढे तेज , केवढी श्रमाची पूजा !

श्रमात आत्मोध्दार आहे . फुकट घेण्यात व फुकट देण्यास पतन आहे . हे हिंदी मुलांना , तमाम हिंदी जनतेला समजेल , तो सुदिन . घरी दारी , शाळेत हे शिक्षण देण्यात आले पाहिजे . उष्टे कोणाला घालू नये , असा धर्मनियमच झाला पाहिजे . खरा धर्म श्रमांना उत्तेजन देणे हाच होल . आळसाने भीक मागणारा व श्रीमंत असल्यामुळे गाद्यांवर लोळून खाणार , दोघे किडेच ! श्रीमंतही दुसर्‍याच्या श्रमावरच जगतो व आळशी दुसर्‍याच्या श्रमानेच खातो . हे दोघे समाजवृक्षावरील बांडगुळे आहेत . उन्हातान्हात काम करणारा मजूर , रस्ते झाडणारा झाडूवाला , मलमूत्र नेणारी भंगी , मेलेली गुरे फाडणारा ढोर , वहाणा बांधणारा चांभार हे सारे , आयतेखाऊ लोकांपेक्षा पवित्र आहेत् , श्रेष्ठ आहेत . काहीतरी निर्माण करा . विचार निर्माण करा ; तरच जगण्याचा तुम्हांस अधिकार आहे . ज्या राष्ट्रात समाजसंवर्धक , समाजरक्षक , समाजपोषक श्रमाची पूजा होते , ते राष्ट्र वैभवावर चढते . बाकीची भिकेस लागतात .

माझ्या आईने मला स्वाभिमान शिकविला ; मिं धेपणा म्हणजे मरण हे शिकविले ; दुसर्‍याचे घेऊ नकोस , दुसर्‍यास दे , हे शिकविले .

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP