मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्यामची आई|

श्यामची आई - रात्र दहावी

’ श्यामची आई’ हे पुस्तक सुंदर, सुगंधी आणि सुरसच नसून, हृदयातील सारा जिव्हाळा यात साने गुरूजींनी ओतलेला आहे.


" मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला . रोज रोज तू जातोस . आई , सांग गं भाऊला मला घेऊन जायला " वच्छी भाऊच्या पाठीस लागली होती .

" तेथे पेंगायला लागशील . तू कशाला येतेस तेथे ? " भाऊ म्हणाला .

" ने रे तिलासुध्दा . तीही ऐकेल . चांगले असेल ते सार्‍यांनी ऐकावे . मेसुध्दा आले असते ; पण हे घरातले आवरता आवरता रात्र होते बाहेर ." भाऊची आई म्हणाली .

" शेजारची भिमी जाते , ती हंशी जाते , हरणीलाही तिचा भाऊ नेतो . तू नाहीसे का रे माझा भाऊ ? " वच्छी केविलवाणी होऊन आपल्या भाऊच्या ह्यदयाला पाझर फोडीत होती .

" चल , तेथे मग ‘ मला झोप येते , चल घरी ’ अशी मला घाई लावलीस तर बघ मात्र ! " असे बजावून वच्छीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले .

आश्रमातील ही गोष्टीरूप प्रवचने ऐकावयास मुलेमुली येऊ लागली . मोठी माणसेही ज्यांना वेळ असतो ती येत असत .

वच्छी व तिचा भाऊ आली तो गोष्ट सुरूही झाली होती .

" शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकून दिले . भाऊबंदकी ! या भारतवर्षात भाऊबंदकी फार ! कौरवपांडवांच्या वेळेपासून आहे , ती अजून आहे . भावाभावांत जेथे प्रेम नाही , तेथे स्वतंत्रता कशी नांदेल , मोक्ष कसा राहील ? ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले , ज्या घतात तीस वर्षे बरावाईट सर्वांचा संसार त्यांनी चालविला , ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दही - दूध दिले , परंतु स्वत : चिंचेचे सारच खाल्ले , ज्या घरात राहून त्यांनी भावाबहिणींची लग्ने केली , त्यांच्या हौशी पुरविल्या , त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगिण्यात आले ! घरात आईलाही अपमानकारक बोलणी सोसावी लागली . आम्ही त्या वेळेस लहान होतो . आई त्या विभक्त होण्याच्या वेळेची हकीकत डोळ्यांत पाणी आणून कधी कधी सांगत असे .

तो दिवस मला अजून आठवतो आहे . आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपति - उत्सव होता . हा नवसाचा उत्सव होता . गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे . महाडच्या धारपांनी हा नवस केला होता . त्या वेळेस अभ्यंकर हे प्रसिध्द राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व आम्हाला कथेला जाऊ दिले नाही . आम्ही निजून गेलो होतो . रात्री नऊदहाच्या सुमारास आईने आम्हास उठविले . माझे आईबाप त्या वेळेस घरातून बाहेर पडत होते . आईच्या डोळ्यांतून अश्रू गळत होते . ज्या घरात राहून तिने मोर्‍या गाईचे दूध काढले , गडी माणसांना जेवावयास पोटभर घातले , ज्या घरात एके काळी ती सोन्यांनी नटून मिरवली , ते घर , ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती . दिवसा लाज म्हणून रात्री बाहेर पडत होती . माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता . यशवंताच्या पाठचा तो भाऊ . वडील पुढे झाले ; त्यांच्या पाठोपाठ आई व मी मुकाट्याने जात होतो ! कोठे जात होतो ? आईच्या माहेरी जात होतो . गावातच आईचे माहेर होते . आजोळच्या घरी त्या वेळेस कोणी नव्हते . आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेली होती . काही दिवसांनी ती परत येणार होती . रात्री लपतछपत आम्ही आजोबांच्या घरी आलो . देवळात आनंद चालला होता ; परंतु आम्ही सुतक्यासारखे वनात चाललो होतो . देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात .

नवीन घरी सवय झाली ; परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती . काही दिवसांनी आजी परत आली . माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती , तरी थोडी हट्टी होती . माझी आई होता होईतो आजीजवळ मिळते घेई . कारण स्वत : ची परिस्थिती ती ओळखून होती .

आईच्या मनात माहेरी राहणे फार खाई . तिला अपमान वाटे . नवर्‍यासह माहेरी राहणे , त्याहून मरण बरे असे तिला होई . तिचा स्वभाव फार मानी होता . एक दिवस आजी व आजोबा देवळात पुराण ऐकावयास गेले होते . ओटीवर वडील जमाखर्च लिहीत होते . आई ओटीवर गेली व म्हणाली , " माझ्याच्याने येथे अत : पर राहवत नाही . मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा . येथे खाणेपिणे म्हणजे जिवावर येते ."

वडील म्हणाले , " अंग , आपण आपलेच भात खातो ना ? फक्त येथे राहतो . घर बांधणे म्हणजे का थट्टा आहे ? तुम्हा बायकांना सांगायला काय ? पुरुषांच्या अडचणी तुम्हांला काय माहीत ?"

आई एकदम संतापून म्हणाली ," तुम्हा पुरुषांच्या स्वाभिमानच नाही मुळी ."

माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले ," आम्हाला स्वाभिमानच नाही ! आम्ही माणसेच नाही जणू ! दरिद्री माणसाचा सारी दुनिया अपमान करते , मग बायको का करणार नाही ? कर , तूही अपमान कर . तूही वाटेल तसे बोल !"

वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले . " तुमचा अपमान करावयाचा माझा हेतू नव्हता हो , उगाच काही तरी मनास लावून घ्यावयाचे ; पण मला येथे खरेच राहावेसे वाटत नाही ."

" मलाही का राहावे असे वाटते ? परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना ? कर्ज आहे त्याचे व्याजही देता येत नाही . घर कशाने बांधावयाचे ? कसे तरी गुरांच्या गोठ्यासारखे नाही ना घर बांधावयाचे ? त्यात राहणे अपमानच तो ." वडील आईची समजूत करीत म्हणाले .

" गुरांचा गोठाही चालेल : परंतु तो स्वतंत्र असला , आपला असला म्हणजे झाले . अगदी साधी गवतारू झोपडी बांधा . तेथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही ; परंतु माहेरच्या माणसांकडे येऊन राहणे नको . माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखादे वेळेस अपमान करतील . आधीच येथून जावे . मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी . अशी झोपडी बांधावयास फार खर्च नाही येणार . या माझ्या हातातील पाटल्या घ्या , या पुरल्या नाहीत तर नथही विका . नथ नसली , पाटली नसली तरी अडत नाही . कोणाकडे मला जावयाचे आहे ? आपली स्वतंत्रता हीच आपली शोभा . कपाळाला कुंकू व गळ्यात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ झाले . स्वतंत्रता गमावून ही नथ व ह्या पाटल्या कशाला ? " असे म्हणून माझ्या आईने खरेच नथ व पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या .

वडील स्तंभितच झाले . " तुला इतके दु : ख होत असेल हे नव्हते मला माहीत . मी लौकरच लहानसे घर बांधतो ." असे वडिलांनी आश्र्वासन दिले .

माझी आई सांगते की , स्वतंत्रता मिळविण्यासाठी दागदागिने फेकून दे , स्वातंत्र्याचा साज , स्वातंत्र्याचा शृंगार हाच सर्वांनी शोभादायक व मौल्यवान शृंगार होय .

आमच्या वाटणीस आलेल्या लहानशी जागेवर झोपडी बांधावयास आरंभ झाला . मातीच्या भिंती होत्या . कच्च्या विटा . त्यास कोकणात मापे म्हणतात . विटाहून आकाराने मापे मोठी असतात . ह्या मापांच्या भिंती उभारल्या . घर गवताने शाकारिले . घरातील जमीन तयार करण्यात आली . अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करण्याचे ठरले . आईला वाईट वाटत होते व आनंदही होत होता . शेजारी दिरांची मोठ मोठाली घरे , बंगले होते आणि आपले लहानसे गवतारू घर , असे तिच्या मनात येई ; परंतु पुन्हा ती म्हणे , " काही झाले तरी हे स्वतंत्र आहे . येथे मी मालकीण आहे . येथून मला कोणी ‘ ऊठ ’ म्हणणार नाही ."

झोपडीवजा घराची वास्तुशांती करण्यात आली . प्रथम घरात देव नेऊन ठेविले . मग सामान नेले . नारळाचे घाटले आईने केले होते . प्रसंग साजरा केला पाहिजे होता . सारा दिवस गडबडीत गेला . वडील लोकांस सांगत होते , " तात्पुरते बांधले आहे . पुढे मोठे बांधू ."

परंतु आई आम्हास म्हणे , " यांच्या हातून मोठे घर आता केव्हा कोठून बांधले जाणार ? मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावर मिळेल ; परंतु ही मठीत माझा स्वर्ग आहे . कारण येथे मी स्वतंत्र आहे . येथे मिधेपणा नाही . येथे खाल्लेली मीठ्भाकर अमृताप्रमाणे लागेल ; परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदीपुरी नको ."

त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो . आकाशात तारे चमकत होते . चंद्र केव्हाच मावळला होता . आईला धन्यता वाटत होती . घर लहान होते ; परंतु घराच्या पुढे व मागे मोठे अंगण होते . हे अंगण हेच जणू खरे घर . आई म्हणाली , " श्याम ! नवे घर तुला आवडले का ?"

मी म्हटले ," हो , छान आहे आपले घर . गरिबांची घरे अशीच असतात . आपल्या मथुरीचे घर असेच आहे . तिला आपले घर फार आवडेल ."

माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले ? जी मथुरी आमच्यकडे कांडायला येई तिच्या घरासारखे आपले घर ! नाही , आईला वाईट वाटले नाही . ती म्हणाली , " होय , मथुरी गरीब आहे ; परंतु मनाने श्रीमंत आहे . आपणही या लहान घरात राहून मनाने मोठा होऊ या . मनाने श्रीमंत होऊ . या ."

" होय , आपण मनाने श्रीमंत होऊ . खरंच होऊ ." मी म्हटले .

इतक्यात आकाशातून एक तारा तुटला . आई एकदम गंभीर झाली . धाकटा भाऊ म्हणाला , आई ! केवढा ग तारा होता !"

आई गंभीरच होती . ती म्हणाली , " श्याम तुझ्या आईच्या जीवनाचा तारा लौकरच तुटेल असे तर नाही ना तो सांगत ? ते वरचे मोठे , मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना बोलवीत ? मला बोलावण्यासाठी तर नाही ना आला तो तारा ?"

" नाही हो आई ! तो हे आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे . त्याला आपले साधे घर , हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल . यमुनेच्या पाण्यात गोपाळांनी हात धुतल्यावर जे शितकण पाण्यात पडत ते खाण्यास स्वर्गातील देव येत , असे त्या हरिविजयात नाही का ? तसे हे घर पाहावयास ते तारेही येतील . कारण आपल्या घरात प्रेम आहे , तू आहेस . " मी म्हटले .

माझ्या पाटीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवीत आई म्हणाली , " श्याम ! कोणी रे तुला असे बोलावयास शिकविले ? किती गोड व सुंदर बोलतोस ? खरेच आपले हे साधे , सुंदर घर तार्‍यांनाही आवडेन , सार्‍यांना आवडेल !"

N/A

References : N/A
Last Updated : January 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP