भागीरथीबाई - अभंग संग्रह १०१ ते ११०

श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत .


अभंग १०१

चैतन्य साक्षी असे ते पवित्र ।

अपवित्राची वार्ता नसे तेथे ॥१॥

ऐसे हे अक्षर परेहूनी पर ।

सदैव उन्मन असे तेथे ॥२॥

ऐसे ब्राह्मण जाणोनि घालितां जानवे ।

त्वं तत असिपदी गांठ देऊं ॥३॥

चिदानंद मिळणी मिळोनीया दोरा ।

जगामध्ये फिरवा सारिखाची ॥४॥

ठकु म्हणे गणिका गणती करुं नका

परमात्मस्वरुपाशी पार नाही ॥५॥

अभंग १०२

गणतीमध्ये आले वायां तेंचि गेले ।

परमात्मा त्यासी म्हणो नये ॥१॥

परमात्मा जाण अखंड अभेद ।

आहे ठेलंठेल व्यापकत्वे ॥२॥

ब्रह्म हे निश्चळ आणि निराकार ।

त्यासी जाणुनी घेतां ब्राह्मण होय ॥३॥

जाणिवेची जाणीव होणे हेंचि मौजीबंधन ।

विप्र द्वीज जाणा पाठांतरी ॥४॥

झाले मौंजीबंधन गेला देहाभिमान ।

चारी वर्ण भेद स्वरुपी नाही ॥५॥

अनुभवी याचा जाणती अनुभव ।

शास्त्रवेदाध्ययने गमेची ना ॥६॥

ठकु म्हणे आम्ही ऐसियासी वरुं ।

पाहूनियां घेऊं अंतःकरणी ॥७॥

अभंग १०३

ब्राह्मणाची पत्नी म्हणती अर्धांगी ।

पूर्ण आंगे जगी क्रीया करी ॥१॥

प्रत्यक्ष पाहूं जातां अर्धे आंग न दिसे ।

मिरवितसे स्पष्ट सर्व देही ॥२॥

स्थूल देही पत्नी अर्धे आंग नसे ।

पुरुषा आंगी अधी चिदसत्ता ॥३॥

स्थूल ऐशी पत्नी कोणती असावी ।

कैसी जाणुनि घ्यावी कोणे रीती ॥४॥

प्रकृतिपुरुषाचा जोडा निर्मियेला ।

विभागोन झाला कोण्या रीती ॥५॥

ठकू म्हणे मुक्ते आत्मयासी वरुं ।

अखंड सौभाग्ये वैधव्य नसे ॥६॥

पद १०४

ठकु म्हणे ब्राह्मणपत्नीपणा पूर्ण ।

जाण तूं निर्गूण होउनि राहे ॥१॥

जनामाजी बोल दिसताती फोल ।

यासी कदा डोल देऊं नको ॥२॥

जगांतूनी निघतां घाली कासोटा ।

धरी घट्ट अंगुठ सद्गुरुचा ॥३॥

जयाचिये बोली साळू नको गळूं ।

बलभीमवचनी ठेवी दृढ विश्वास ॥४॥

भागिरथी जगी फजीता होवोनि ।

लागलीसे चरणी सद्गुरुच्या ॥५॥

अभंग १०५

जन्मोजन्मी तुझा होईन मी दास ।

ऐसी असे आस अंतरीची ॥१॥

तुझी कृपा मज झालीया वांचोनी ।

जगामाजी तोंड कसे दावूं ॥२॥

मज पासोनीया तुझे बोल घेती ।

नाश ते करीती जगामाजी ॥३॥

म्हणोनी तुझीया दयेचा पाझर ।

करी मजवर गुरुवर्या ॥४॥

भूतां दैवतांसी काम न हे सोपी ।

लांच ते मागती जगामाजी ॥५॥

बकरे कोंबडे बळी मागताती ।

लिंबे द्रव्य नारळ भेट घेती ॥६॥

तरी गुरुराया , तुझे बल देईं ।

सदैव चरणी भागिरथीही ॥७॥

अभंग १०६

गुरुराया तुझा ऐसा हा हुकूम ।

कर्म करुनी दावी जगामाजी ॥१॥

ऐसा भक्तापाठी लाविसी तूं लठ्ठा ।

नाम घेतां जगा दुःख वाटे ॥२॥

ब्रह्म म्हणता जना विटाळ तो होतो ।

तरी ब्रह्माचा आचार कैसा दावूं ॥३॥

पत्थर पूजनी त्यांसी प्रेमाचा उमाळा ।

ब्रह्माचा तिटकारा करीती ते ॥४॥

उपदेश देवा न करवे जगासी ।

तुझे स्वरुप भाव लावी माझा ॥५॥

बलभिमरायासी हेचि वीनवणी ।

तंव चरणी ठेवी भागिरथीसी ॥६॥

अभंग १०७

धन्य आजी दीन वसंतपंचमी ।

माघमासी जाणा येत असे ॥१॥

धन्य सद्गुरुनाथ वसंत हो आले ।

दैवते फुलली आनंदाने॥२॥

माघमासी मार्ग पुसतां हे फार ।

झाला तो दाविता स्वरुप हे ॥३॥

शास्त्र हे प्रचीती आत्म हे प्रचीती ।

गुरु हे प्रचीती महानुभव ॥४॥

महावाक्य ध्वनी वायू हा लागतां ।

झाला तत्त्व झाडा तये काळी ॥५॥

काडपिशा वैराग्याची पाने गळाली ।

बोध काळी झडती सर्व माया ॥६॥

बलभीमचरणी सागरची जाणा ।

ठकु मुक्ताफळ चाखितसे ॥७॥

अभंग १०८

नरतनू देह आम्रवृक्ष झाड ।
फुलले फार बोधप्रबोधाने ॥१॥

आम्रफळे जाणा लागलीसे थोर ।

कोकिळा मधुर बोलताती ॥२॥

या रे लहानथोर वृक्षाखाली बसूं ।

फळ चाखुनी पाहूं कडु गोड ॥३॥

बद्ध हे मुमुक्षु येउनी बसती ।

गोड म्हणुनी खाती आवडीने ॥४॥

साधक हे फार डोलूं हो लागती ।

सिद्ध ते बैसती दटूनीया ॥५॥

बलभीम बाळ करी जयजयकार ।

भागीरथी जाण निजानंदी ॥६॥

अभंग १०९

धनी म्हणावा तो कोण ।

निरसी अज्ञान ॥१॥

कुबेर म्हणावा तो कोण ।

जन्ममरण चुकवी जाण ॥२॥

प्रश्नोत्तरे समाधान । दावी ऐसा प्रत्यय जाण ॥३॥

देव म्हणावा तो कोण । अंधःकार निरसी दोन ॥४॥

पती म्हणावा तो कोण । करी पावन जीवां जाण ॥५॥

मालक म्हणावा तो कोण । दावी विठ्ठचरण ॥६॥

ऐसा बळिवंत असे जो कोण । त्याचे सेवेसी ठकू जाण ॥७॥

अभंग ११०

जे जे मानी गा भगवंत ।

त्यासी सांगे माझे हीत ॥१॥

करुनी दावा गे निश्चित ।

मनोभावे आपुले हीत ॥२॥

एक वेळ देहासी मरण ।

घडोघडी नका करुं स्मरण ॥३॥

ऐसे दाविले सद्गुरुनाथे ।

तेंचि धरी हृदया आंत ॥४॥

झुगारावे मानापमान ।

भक्तिभावे आचरण ॥५॥

बलभीमवचन सेवावे ।

भागीरथी लीन व्हावे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 30, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP