मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|ग्रामगीता|

ग्रामगीता - अध्याय सहावा

जनसेवा हीच ईशसेवा मानणारे तुकडोजी महाराज हे समाजसुधारक संत होते.


॥ श्रीगुरूदेवाय नम: ॥

ईश्वरें जग केलें निर्माण । त्याचें कार्य अजूनि अपूर्ण । तें आपल्यापरीं कराया पूर्ण । सदबुध्दि दिली मानवा ॥१॥
एकापासूनि अनेक व्हावे । अनेकासि एकत्वीं आणावें । हा आपुला मूळ संकल्प देवें । चित्तीं घातला सर्वांच्या ॥२॥
अनेक ईषणा प्रेरणा । त्या कारण होती आत्मविकसना । पुत्रपौत्रादि रूपें नाना । मानव आपणा प्रकटवी ॥३॥
कोणी शिष्यशाखा  वाढवी । कोणी ग्रंथादिक उपजवी । जगीं आपुली परंपरा चालावी । ऐसी इच्छा स्वाभाविक ॥४॥
जगावरचि मानव जगला । समुदायांतचि उन्नत झाला । तो समुदायाचें कार्य विसरला । तरि तें उचित कैसें ? ॥५॥
पिंडब्रह्मांड हें निगडित । संस्कारहि जगाशीं  संबंधित । आत्मज्ञानें राहो जीव अलिप्त । परि उपेक्षा न व्हावी जगाची ॥६॥
सत्य शिव सुखी सुंदर । ऐसा व्हावा हा संसार । हें सोपविलें कर्तव्य थोर । देवें मानवाप्रति ॥७॥
मानवें आपुला उध्दार करावा । तैसाचि समाज सुधारावा । यासाठीच दिला धर्म आघवा । नेमूनि सकळां ॥८॥
यासाठीच झाले अवतार । यासाठीच संतभक्तांचा व्यवहार । ’ सुखी करीन अवघाचि संसार ’ । ब्रीद तयांचें ॥९॥
न सुधारवे अखिल विश्व । तरि उन्नत करावें आपुलेंचि गांव । यानेच संतोषेल देवाधिदेव । लाभेल ठेव मोक्षाची ॥१०॥
हें ठीक म्हणती श्रोतेजन । परि गांवाप्रति आमुचें कर्तव्य कोण ? काय होईल आम्हीच झुरोन ? गांवी कोणी ऐकेना ॥११॥
सर्व करीती आपुल्यासाठी । स्त्रीपुत्रांसाठी चैनीसाठी । परि आठवचि नाही येरासाठी । कांही करावें म्हणूनि त्यां ॥१२॥
सर्वांस वाटे आमुचें ऐकावें । पण ऐकतील कैसे हें न ठावें । म्हणोनि यास्तव पुढे जावें । न वाटे कोणा ॥१३॥
कार्य करावया पुढे जावें । साथ न मिळतां फजीत व्हावें । संकटी कोणी जीव द्यावे ? । वाटे ऐसें बहुतेका ॥१४॥
आम्हांस वाटे गांव सुधारावें । परि सांगा त्यासाठी काय करावें ? कैसे वळतील आघवे । लोक सन्मार्गीं ? ॥१५॥
आपण पुसलिया प्रश्नाचें । मी उत्तर देईन साचें । परि लक्षीं ठेवोनि ह्रदयाचे । आचरा तैसें ॥१६॥
मी सांगेन म्हणूनि नव्हे । संती हेंचि कथिले बरवें । माझा विश्वास जेथे धांवें । तेंचि सांगेन तुम्हांला ॥१७॥
सर्वाआधी एक निश्चय । लोक असती अनुकरप्रिय । विशेष दिसे ती घेती सोय । न सांगतांहि ॥१८॥
मुख्य कार्यकर्त्याची राहणी । निरोक्षोनि बघतीं कोणी । लागती त्याच्याच मागे धावोनी । वत्स जैसे ॥१९॥
म्हणोनी कार्यकर्त्यांत असावें आकर्षण । सेवाचारित्र्यांचे ओजपूर्ण । सुधार नोहे त्यावांचून । गांवाच्या कोण्या ॥२०॥
या मार्गानेचि जनजागृती । हेंचि सूत्र घ्यावें हाती । आपण वागावें तैसे वागती । जनहि सारे ॥२१॥
यासाठी प्रथम करावी आपुली शुध्दि । शरीरशुध्दि ह्रदयशुध्दि । घरशुध्दि ग्रामशुध्दि । सर्वतोपरीं ॥२२॥
जैसें तुम्ही कराल आपुले घर । तें पाहतील जन सत्वर । करतील तैसेचि प्रकार । आपुल्या घरीं ॥२३॥
सुंदर दृश्य पाहतां डोळां । आवडे पाहणाराहि तसाच सोहळा । आपणहि वर्तावयाचा चाळा । करितो प्राणी ॥२४॥
फुललेली बाग पाहिली । अनंतरंगी फुलें फुललीं । सुरस फळांनी बहरली । सौंदर्यखाणि ॥२५॥
पाणी वाहे झरणापरी । वृक्षलतांच्या कुंजांतरी । आमोद दरवळे नानापरी । फळफुलांचा ॥२६॥
गर्द छायेतळीं हिरवळ । दुर्वांकुरांचे जाळे कोमळ । नाना रंगी फुलपाखरें सोज्वळ । मन मोहविती जीवांचें ॥२७॥
कोठे पाणी चमके आरशापरी । कोठे दगडांच्या कणांची कुसरी । कोठे कोमलरूप भूमि धरी । वाटे अंकीं लोळावें ॥२८॥
कोठे भूमिचेहि भिन्न वर्ण । कोठे काळे, पिंगटपण । कोठे पांढरे लाल मधून । सुवर्णापरी ॥२९॥
लतालतावरि झुलती पक्षी । सर्व फळाफुलांचे  साक्षी । जरी फिरती अंतरीक्षीं । पिकलीं फळें त्या ठावी ॥३०॥
उडोनि तेथेचि मारिती झडप । रसाचा आस्वाद घेती अमूप । जैसा करील प्राणी संकल्प । तैसा भोग त्या पावे ॥३१॥
जिकडे तिकडे सुगंध उसळे । उल्हासित इंद्रियें भोगती सगळें । नाक कान जीभ डोळे । नाना विषयारसानंद ॥३२॥
ऐसें दृश्य पाहे प्राणी । तेव्हा आपणहि करावें वाटे मनीं । जातो घरासि परतोनि । सजवाया घर आपुलें ॥३३॥
लहान अंगणी बाग लावी । अथवा कुंडींतचि फुलें फुलवी । शृंगारी झोपडी आपुली बरवी । आपुल्यापरीं ॥३४॥
जरि त्या बागचि न दिसता । तरि तो कैसा प्रयत्न करता ?  ऐसाचि आहे मानव तत्त्वता । जें देखें आपण करी ॥३५॥
विशेषतः ऐसें मुलांचे वागणें । त्यांचें कार्यंचि प्रतिध्वनि उठवणें । जें जें पाहतील डोळयाने । तेंचि आचरती उल्हासें ॥३६॥
म्हणूनि मुख्यांची ही जबाबदारी । ते जे करतील ग्रामभीतरी । मुलें आचरतील घरीं दारीं । मातापित्यासि वळवोनि ॥३७॥
एका प्रमुखाने कोंबडी पाळली । तिला सुंदर पिलीं झालीं । दुसर्‍यानेहि तीच घेतली । कला त्याची ॥३८॥
मग गांवासि तोच आनंद । चढला तयांना उन्माद । लढाई करण्याचा लागला नाद । कोंबडियांची ॥३९॥
एकादा कोंबडयांची झुंज पाहिली । सर्व गांवास धुंदी चढली । मग कोंबडयात्रा भरली । लढाईसाठी ॥४०॥
बांधतीं कोंबडयांच्या पायीं सुरा । लढविती मैदानीं भरभरा । रक्तबंबाळ खेळ सारा । क्रूरवृत्तीने वाढविला ॥४१॥
मग पाटील म्हणे कर लावा । पैदासीचा धंदा वाढवा । लोक चेतले गांवोगांवां । झुंज करण्या कोंबडयांची ॥४२॥
बिचार्‍या दीन जीवानें काय केलें । यांनीच त्यास निमित्त धरलें । त्यांचे प्राण लढतां गेले । धंदे वाढले पापांचे ॥४३॥
एका प्रमुखाने चालना दिली । ती रीती सर्व गांवाने उचलली । प्रौढ माणसेंहि करूं लागली । लढाई मग कोंबडयांची ॥४४॥
सारी शक्ति कोंबडयांमागे । प्रतिष्ठितहि झाले बेढंगे । म्हणोनि एकाने आपुल्या अंगे । नगर-आखाडा निर्मिला ॥४५॥
जमविलें बाल तरुण कांही । उल्हास ओतिला त्यांच्या देहीं । व्यायामाच्या नव्या उत्साहीं । लाविलें तयां ॥४६॥
प्रथम भरविला गांवी दंगल । इनामी कुस्त्यांचा जंगी मेळ । पाहतांचि मुलेंबाळें सकळ । लागले करण्या व्यायाम ॥४७॥
घरोघरीं मुले खेळती कुस्ती । गल्लीगलींत चंग बांधती । चढली व्यायामाची मस्ती । लहानथोरां ॥४८॥
कवायत करेला मल्लखांब । लाठीकाठी भाला लेजीम । तरवार छडीपट्टा मर्दानी काम । व्यायामाचें ॥४९॥
त्याने गांवांतील वाईट व्यसन । सर्वचि गेलें हारपोन । शरीर कमाविण्याची लागली धुन । लहानथोरां ॥५०॥
जो तो आपुली छाती पाही । दंड मोंढे फिरवीत राही । मांडियांचे पट वाढवी देहीं । सौंदर्य यावया मल्लाचें ॥५१॥
मैदानी मर्दानी खेळ चाले । सर्व गांव लाल मातीने रंगलें । कोंबडयांचे व्यसन कमी झालें । लढाई गेले विसरोनि ॥५२॥
दुसर्‍या एकास बुध्दि सुचली । त्याने जोडी चारूनि मस्त केली । दुसर्‍या बैलजोडीशीं लाविली । धावण्यासाठी ॥५३॥
जनलोकांचें लक्ष वेधलें । त्यांतचि मनोरंजन वाटलें । पुढे शंकरपट सुरू झाले । गांवोगांवीं ॥५४॥
त्यांत कांही उद्देश उत्तम असती । बैलांना खुराक देवोनि बनविती । स्पर्धेने वाढविती बैलांची शक्ति । शेतीसाठी ॥५५॥
पण त्यांतूनि प्रकटे दुष्परिणाम । राहतें मागे उत्तम काम । बैल पळविण्याचाहि हंगाम । पुढे येतो ॥५६॥
मग जो बैल पळेना । त्यास टोचती तुतारी-अणा । रक्ताळोनि दुखविती प्राणा । नंदीबैलाच्या ॥५७॥
राहिलें शेतीभातीचें काम । शंकरपटाचाचि उद्दम । माणसें करिती कसाबकर्म । नानापरी ॥५८॥
सहजचि गाडी जुंपती । पुराणी हातीं धरोनि टोचती । पळतां पळेना तरी मारिती । निर्दयपणें ॥५९॥
गांव पडले त्याच प्रवाहीं । उत्तम नाद घेणेंचि नाही । राक्षसी धंदे ग्रामीं सर्वहि । वाढूं लागती त्वरेने ॥६०॥
ऐसा धूमधडाका चालला । एकाने गांवी तमाशाचि आणला । सारा रागरंग बदलला । मागीलपैकी ॥६१॥
जो तो लावणी मुखें उच्चारी । घरींदारीं शेतीं मंदिरीं। ज्याच्या त्याच्या तोंडी सारीं । गाणीं विषयांचीं ॥६२॥
तमाशाचे प्रस्थ वाढलें । लहान मुलांत संस्कार बिंबले । मुलें तरुणहि नटूं लागले । तमाशागिरापरी ॥६३॥
जो तो चांगभांग करी । मुद्रा सुरू झाली लाजरी । हावभाव शरीरावरी । नाचती घरी मुलेंबाळें ॥६४॥
आईवडील कौतुक करिती । मुली मौज म्हणोनि हासती । कोणी ताटपाट बडविती ।  डफासारिखे आनंदे ॥६५॥
परंतु कोणी इकडे बघेना । काय होणार विंटबना । सारा गांव तमाशाच्या रंजना । राजी झाला ॥६६॥
’ डुबती ’ म्हणे ढोलक ओरडून । तुणतुणें म्हणें ’ कोणकोण ’ । मंजिरा सांगे ’ सर्वजन ’ । परि कोणा न कळें हें ॥६७॥
मग कूठले कथाकीर्तन । भजन वा साधूंचें प्रवचन । टिंगल करिती मार्गी तरुण । सदभावांची ॥६८॥
ज्याने गांवी तमाशे आणले । त्याचे पुत्र नाचे निघाले । गांवोगांवी जाऊं लागले । तेथेहि झाले सुरू फड ॥६९॥
मुलींना मार्गी जायाची चोरी । मुलें छळती निलाजरीं । येणें जाणें वाढवूनि घरीं । नेल्या काढून कित्येक ॥७०॥
मग पाटलासि पडला उजेड । अरे काय वाढले थोतांड ? माझ्या घरांतहि शिरले बंड । तमाशाचें ॥७१॥
माझ्या भावाने तमाशा आणला । त्याचा तर वंशच बिघडला । मुलगी पळाली मुलगाहि गेला । घर दुसर्‍याचे बुडवोनि ॥७२॥
मग विचारी ज्याला त्याला । कैसें बंद करावें तमाशाला ? जो तो म्हणे तुम्हीच होऊं दिला । धिंगाणा या गांवाचा ॥७३॥
कुस्ती व्यायामाच्या नादांत । गांव सुंदर आदर्श अदभुत । परि हे भलभलते छंद नेत । लया सगळया गांवासि ॥७४॥
सुंदर होतें मुलांचें खेळणें । बरें होतें बैल तयार करणें । पण या पापाने औदासीन्य । आणले गांवी ॥७५॥
आता भोगा त्याची सजा । सारींच मुलें वाजविती वाजा । झाला तमाशाचाचि अगाजा । सर्व गांवी उत्सवीं ॥७६॥
या गांवांत जे जे येती । ते तमाशाचे रंगीच रंगले असती । ओघ न थांबवे पाटलाप्रति । कठीण झालें ॥७७॥
एकाने त्यांत छंद आणला । दारू पिऊन फिरूं लागला । तमाशाचे आनंदाचा लोकांला । कळस दिसे त्या ठायीं ॥७८॥
हळुहळू तीच वाढली प्रथा । दारूबाजांचा जमला जत्था । काय पुसतां गांवाची व्यथा । आता तुम्ही ॥७९॥
कोणी दंढारी तमाशे करी । कोणी दारु पिऊन शिव्या उच्चारी । कोणी कोणा न माने तिळभरी । लहान थोर स्वैर झाले ॥८०॥
व्यभिचार्‍यांची झाली दाटी । गंजिफा खेळती पैशांसाठी । मुलें करिती चोरीचपाटी । काढती भट्टी घरोघरीं ॥८१॥
मांस खाण्याचें वाढलें व्यसन । चैन न पडे मद्यावांचून । अनेक रोग मांसमद्यांतून । वाढले गांवी ॥८२॥
मुलें तेल लावूनि बाल फिरविती । पान चावूनि कोठेहि थुंकती । सिगारेट ओढूनि धुर सोडिती । धाकचि नाही कोणाचा ॥८३॥
मजूर कष्टाने पैसा मिळविती । तोहि दारूपायीं उधळती । मुलाबाळां उपवास पडती । होय दुर्गति जीवनाची ॥८४॥
दारू पिऊनि मारिती स्त्रीला । सगळया गांवीच चळ सुटला । पूर आला भांडाभांडीला । कोर्टकचेर्‍या गजबजल्या ॥८५॥
लोळे गटारांत अमीरहि । कोणीहि कोणास मारूनि देई । मुलीबाळी सुरक्षित नाही । ऐसा प्रसंग ओढवला ॥८६॥
पैसाआडका नष्ट झाला । ऐसा गांव ’ उन्नती ’ स चढला ! सगळ्या गांवाचाचि धिंगाणा केला । दारूबाजांनी ॥८७॥
गावांचा मुखंड दारू प्याला । म्हणोनि व्यसन लागले बहुतेकाला । मग सर्व गांवचि लागला । गटारगंगेमार्गी ॥८८॥
तैसेंचि आहे जुगाराचे । चोरीचें आणि व्यभिचाराचें । पहिले बिघडती मुखंड आमुचे । मग बिघडे गांव सारा ॥८९॥
आज जें जें लोकांचें बिघडले । तें तरी कुणाचें होतें पाहिलें । म्हणोनीच तैसे करूं लागले । लोक सर्व ॥९०॥
स्वतः प्रथम त्याने आचरिलें । मगचि लोकांना सांगितलें । म्हणोनीच जनलोक रंगले । रंगी त्याच्या ॥९१॥
सर्व गांवाचें वर्तन । कार्यकत्यावरचि जाण । कार्यकर्ते गांवाचें प्राण । समजों आम्ही ॥९२॥
गांवी चार भले वागती । तरीच गांवा होय उत्तमगति । मुख्य म्हणविणारे स्वार्थ साधती । तरि सर्व गांवचि तैसें ॥९३॥
गांव म्हणजे शुध्द आरसा । जें दाखवाल तें दिसेल सहसा । जें कराल तें करील खासा । गांव आमुचा ॥९४॥
मी जें प्रारंभी बोललो । बाग बघोनि प्रसन्न झालों । तैसाचि घरीं वर्तूं लागलों । ऐसें होते सकळांचें ॥९५॥
म्हणोनि मी आपणांसि विनवितों । योग्य जो वाटे आदर्श तो तो । निर्माण करूनि ठेवतां येतो । प्रभाव आपुल्या अंगीं ॥९६॥
अस्थिपंजर फकीर तो आज । भूमिदानयज्ञाचा उठवी आवाज । तरि तीच लाट उसळली सहज । गांवोगांवीं ॥९७॥
आपली झुगारूनि सुखचैन । किती लोक दान मागती फिरून । गरीब-अमीरहि स्वार्थ विसरून । देती भूदान उल्हासें ॥९८॥
पुढारी जें जें गांवी करी । लोक तैसेंचि वागती घरोघरीं । म्हणोनि याची आहे जबाबदारी । मुखंडावरती ॥९९॥
तेव्हा काय करावें आपुल्या गांवी । ती योजना आपण ठरवावी । तैसीच आपुली सर्व सुधारावी । टापटीप ॥१००॥
त्यांत नेहमी सावध असावें । जें जें करणें असेल बरवें । तें दूरदृष्टीने शोधूनि पाहावें । तेव्हा घ्यावे कार्य हातीं ॥१०१॥
नाहीतरि सहज केलें । परि तें प्राणावरीच आलें । सारें गांवचि बिघडलें । होईल ऐसें ॥१०२॥
म्हणोनि गांवी तेंच सुरू करावें । ज्याने गांव नांवलौकिक पावे । येरव्ही शिवेआंतहि येऊं न द्यावें । विडंबनकार्य ॥१०३॥
कदाचित केलें एखाद्याने । तेंहि सहन करू नये कोणे । लावावी उधळोनि समंजसपणें । वाईट रीति ॥१०४॥
कारण जैसी संगती घडे । तैसे अनुभवा येई रोकडे । म्हणोनि सावध असावें मागेपुढे । उत्तम गुण वाढवाया ॥१०५॥
उत्तम खेळ उत्तम कार्य । उत्तम कला उत्तम सौंदर्य । गांवास भूषण ज्याने होय । तें अगत्याने उचलावें ॥१०६॥
कोठे कांही व्यसन घुसलें । त्यास लगेच पाहिजे कमी केलें । त्यासाठी गांवचे मुखंड लागले । पाहिजेंत पाठीं ॥१०७॥
जरी कांही नाराजी झाली । मुलेंबाळें रुसूं लागलीं । तरी पाहिजे समज घातली । वडीलधार्‍यांनी ॥१०८॥
सर्वांमाजी उत्तम उपाय । तें वातावरणचि बदलूनि जाय । ऐशा नव्या छंदाची द्यावी सोय । कार्यकर्त्यांनी ॥१०९॥
कायकर्ता तोचि गांवचा । ज्यास लोभचि नाही कोणचा । आमुचा गांवचि मोक्ष, आमुचा । मानावा त्याने ॥११०॥
मग त्याचा आदर्श गांव पाही । सर्व गांवचि सुधरोनि जाई । मुखंडावरीच गांव राही । तुकडया म्हणे ॥१११॥
इति श्री ग्रामगीत ग्रंथ । गुरु-शास्त्र-स्वानुभवसंमत । निवेदिलें ग्रामजीवनमर्म येथ । सहावा अध्याय संपूर्ण ॥११२॥

॥ सदगुरुनाथ महाराज की जय ॥

निढळींचा घाम यज्ञीय तें द्रव्य ।
जीवनाचें काव्य विन्या म्हणे ॥

-आचार्य विनोबा भावे.

N/A

References : N/A
Last Updated : September 20, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP